देशातील 19 राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही : आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा कहर आता हळूहळू कमी होत असतानाच गुरुवारी सकाळपर्यंतच्या मागील चोवीस तासात नव्या बाधितांपेक्षा उपचाराअंती डिस्चार्ज मिळणाऱयांचा आकडा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात 108 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. पण देशातील 19 राज्यांमध्ये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
देशात गेल्या 24 तासात 12 हजार 923 नवीन कोरोना प्रकरणे नोंद झाली असून 108 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 11 हजार 764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अजूनही देशात 1 लाख 42 हजार 562 रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 70 लाख लोकांना लस देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 8 लाख 71 हजार 294 वर पोहोचली आहे. तर एकूण 1 लाख 55 हजार 360 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनावर मात करून 1 कोटी 5 लाख 73 हजार 372 लोक बरे झाले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, दिल्ली, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, नागालँड, मेघालय, मिझोराम, ओडिशा, पाँडिचेरी, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनामुळे गुरुवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.