देशाने नोंदविली पाच महिन्यातील सर्वात कमी संख्या
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे नवे 28,204 रुग्ण आढळले असून ही गेल्या पाच महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे. याच कालावधीत 373 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. बहुतेक राज्यांमध्ये आता शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा पूर्णतः उघडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या पूर्ण आठवडय़ाचा विचार करता, देशात आढळलेल्या एकंदर रुग्णांपैकी 51.1 टक्के रुग्ण केवळ केरळमध्ये सापडले आहेत, असे दिसून येते.
देशाच्या 37 जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्यापही आठवडय़ाला 10 टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुसऱया लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे लोकांनी कोरोनाविषयीचे नियम, मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतराचा नियम यांचे कसोशीने पालन करावयास हवे, असे सांगण्यात आले.
कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण आता 97.45 टक्क्यांवर पोहचले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,88,508 इतकी असून त्यापैकी 1 लाखांहून अधिक केवळ केरळ राज्यातील आहेत. आतापर्यंत या संसर्गामुळे देशात 4,28,682 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 3,19,98,158 इतकी आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.