तीन वर्षांपासून मनपाच्या कामकाजात व्यत्यय : नागरिकांची गैरसोय : कामकाज सुरळीत ठेवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दीड वर्षापासून महापालिका कार्यालयाच्या कारभारात अडथळे निर्माण झाले असल्याने कार्यालयीन कामकाज सुरळीत सुरू नाही. अधिवेशन आणि विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील 25 दिवसांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. नवीन वर्षात तरी महापालिकेचे कामकाज सुरळीत होणार का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील कामकाजासाठी नागरिकांना महापालिकेकडे धाव घ्यावी लागते. मात्र मागील तीन वर्षांपासून मनपाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. विविध कारणांमुळे मनपाचे अधिकारी कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतर कामात व्यग्र रहात असल्याने कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. शहरात अतिवृष्टीनंतर विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांना धाव घ्यावी लागते. परिणामी कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होतात. शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी मनपा कार्यालयात जावे लागते. इमारत बांधकाम परवाना, तसेच अन्य कामांसाठी देखील मनपा कार्यालयात धाव घ्यावी लागते. शासनाच्या नियमानुसार मालमत्तेच्या नोंदीमध्ये बदल करण्यासाठी देखील मनपा कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे मनपा कार्यालय हे वर्दळीचे ठिकाण तसेच महत्त्वाचे कार्यालय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील कारभार सतत सुरू ठेवावा लागतो. मात्र शहरात अतिवृष्टीनंतर असंख्य नागरिकांचे नुकसान झाले. 1200 हून अधिक घरांची पडझड झाली, पिकांची हानी झाली.
त्याचप्रमाणे काही आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान सोसावे लागले. या सर्व नुकसानीची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना जुंपले होते. परिणामी कार्यालयीन कामकाज ठप्प होते.
त्यानंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रतिबंधक उपाय योजना राबविण्यासाठी मनपा प्रशासनालाच धावपळ करावी लागली. शहरात लॉकडाऊन केल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प होते. कोरोनाबाधितांची माहिती घेणे, त्यांना क्वॉरंटाईन करणे, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करणे, परप्रांतियांची काळजी घेणे, त्याचप्रमाणे पर राज्यातून आलेल्या नागरिकांना
क्वॉरंटाईन करणे, शहरात सॅनिटायझर फवारणी करणे, बाजारपेठा बंद ठेवण्यासाठी कारवाई करणे अशा विविध कामात मनपाचे अधिकारी व कर्मचारी गुंतले होते. वर्षभर या कामात मनपाचा कर्मचारी वर्ग अडकून होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाज झालेच नाही. त्यानंतर लागलीच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. परत 2020-21 च्या कालावधीत तीन महिन्याचा लॉकडाऊन करण्यात आला. जून महिन्यात पावसाळय़ामुळे कोणतेच कामकाज झाले नाही. विविध सर्वेक्षण, महसूल वसुली, मतदार याद्या तयार करणे अशा कामात मनपाचे अधिकारी व कर्मचारी गुंतून होते.
ऑगस्टमध्ये महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे मनपाचा कर्मचारीवर्ग दीड महिना या कामात अडकून होता. त्यानंतर विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली. व अधिवेशन देखील भरविण्यात आले. त्यामुळे हे वर्ष देखील वाया गेले. या दरम्यान मनपाचे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली. मागील दोन वर्षात कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांची धावपळ वाढली आहे. आता हिवाळी अधिवेशनही संपले असून, नवीन वर्षाततरी महापालिकेचे कामकाज सुरळीत होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मनपा कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू ठेवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.