नव्या पिढीची वाटचाल सकारात्मक होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
21 व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने सुरू आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे जातील यावर भर दिला असून मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्याकडे अधिक लक्ष दिल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकऱया, कामाचे स्वरुप यामध्ये होणाऱया बदलांची चर्चा होत आहे. अशात कौशल्य आणि ज्ञान यावर आधारित शिक्षण धोरण असणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रीय शिक्षण धोरणविषयक परिषदेला संबोधित केले. नव्या शिक्षण धोरणाचे महत्त्व यावेळी त्यांनी विशद केले. नवे शिक्षण धोरण हे ‘स्टडिंग’ ऐवजी ‘लर्निंग’वर अधिक भर देणारे आहे. तसेच अभ्यासक्रमापेक्षाही या धोरणात आव्हानात्मक विचारांना प्राधान्य देण्यात आले आहे. एवढेच नाही तर विविध भाषांवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान कसे प्राप्त होईल यावर नव्या शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवे शिक्षण धोरण हे देशाचे शिक्षण धोरण आहे. या धोरणात सरकारने फेरबदल घडवला असला तरी त्यात नवोदित पिढीचे हित जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे देशाचे परराष्ट्र धोरण, सुरक्षा धोरण असते, त्याचप्रमाणे नव्या शिक्षण धोरणाचे स्वरुप ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्या शिक्षण धोरणासंदर्भात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या मनात अनेक प्रश्न असतील, या सगळय़ा प्रश्नांचे निराकरण करून ते प्रभावीपणे राबविण्याचा विचार आपण करायला हवा, असेही मोदी पुढे म्हणाले.