स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय संमेलनात मोदींची घोषणा : तरुणाईवर लक्ष केंद्रीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ‘प्रारंभ ः स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट’ला दृकश्राव्य यंत्रणेद्वारे संबोधित केले आहे. या दोन दिवसीय संमेलनात पंतप्रधानांनी बे-ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशनच्या (बिम्सटेक) युवा नवोन्मेषींसोबत संवाद साधला. बिम्सटेकमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंडचा अंतर्भाव होतो. पंतप्रधानांनी स्टार्टअप्सला प्रारंभिक भांडवल उपलब्ध करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या स्टार्टअप सीड फंडच्या निर्मितीची घोषणा केली आहे. तरुणाईवर लक्ष केंद्रीत असणारी स्टार्टअप व्यवस्था भारत तयार करू पाहत आहे. नव्या दशकात आम्ही सर्व स्टार्टअप्सना नवी ओळख मिळवून देऊ आणि बिम्सटेकच्या सामर्थ्याची जाणीव जगाला करून देऊ, असे मोदी म्हणाले.
बदल घडवून आणण्याच्या प्रवासात प्रत्येक देशाचे स्वतःचे अनुभव असतात. भारताने 5 वर्षांचे अनुभव मांडण्यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. बिम्सटेक देशांनीही स्वतःचे अनुभव मांडावेत. हेच अनुभव आम्हा सर्वांना शिकण्यास मदत करतील. स्टार्टअप इंडिया मोहिमेत प्रारंभी अनेक आव्हाने होती. तर आज भारत जगातील सर्वात मोठय़ा स्टार्टअप व्यवस्थेपैकी एक आहे. 14 हजार स्टार्टअप्स कार्यरत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
डिजिटल क्रांतीचे शतक
12 क्षेत्रांमध्ये देशाने स्टार्टअप सुरू केले होते. या क्षेत्रातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल क्रांतीचे हे शतक आहे, तसेच याला आशियाचे शतकही म्हटले जाते. भविष्यातील उद्योजक आमच्याकडे तयार व्हावेत ही काळाची गरज आहे. याकरिता आशियाच्या देशांना जबाबदारी उचलावी लागणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
संयुक्त वारशाने जोडून ठेवले
आमच्या शतकांपेक्षा जुन्या संबंधांच्या संयुक्त वारशाने आम्हा सर्वांना जोडून ठेवले आहे. आम्ही आमच्या कल्पनांचे अधिक प्रभावीपणे आदान-प्रदान करू शकतो. आम्ही सुखःदुख वाटून घेतो, तर आता आम्ही आमचे यशही सर्वांना उपलब्ध करू. आमच्या तरुणाईत ऊर्जा, उत्सुकता असून यात पूर्ण जगासाठी नव्या संधी दिसून येत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
छोटय़ा शहरांनी मारली बाजी
स्टार्टअपनी आपत्तीत संधी शोधली, संकटात विश्वास बळावण्याचे काम केले. त्यांचे यश मोठय़ा शहरांपुरते मर्यादित नाही. आज पुरस्कार मिळालेले 8 स्टार्टअप छोटय़ा शहरांमधील आहेत. प्रत्येक राज्य स्टार्टअप मोहिमेत भागीदार आहे. प्रत्येक राज्य स्वतःच्या स्थानिक शक्यतांनुरुप स्टार्टअप्सना चालना देत आहे. देशातील 80 टक्के जिल्हे स्टार्टअप मोहिमेशी जोडले गेले आहेत. 45 टक्के स्टार्टअप छोटय़ा शहरांमधील असल्याचे मोदी म्हणाले.
कृषी पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी शेतीशी संबंधित पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी देशाने 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे. यातून स्टार्टअपसाठी अनेक संधी निर्माण होतील. हा नवा दृष्टीकोन नव्या तंत्रज्ञानाला जन्म देत आहे. नवनव्या स्टार्टअपसोबत विविध प्रकारच्या कल्पना समोर येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्यांची व्याप्ती अभूतपूर्व आहे. नवे आव्हान उभे ठाकल्यास एखादा स्टार्टअप समोर येत असल्याचे विधान मोदींनी केले आहे.