वार्ताहर/ उंडाळे
दक्षिण मांड नदीवर नांदगाव (ता. कराड) येथे अनेक वर्षांपूर्वी धरणवजा पूल बांधला आहे. मात्र गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे, आलेल्या पुरामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला असणारे संरक्षक ग्रील तुटून गेले आहेत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. तरीही जीव मुठीत घेऊन वाहतूक सुरू आहे. शनिवारी तर या पुलावरून शामराव बापू काळे (वय 65) यांचा खाली पडून मृत्यू झाला. त्यामुळे पूल दुरूस्तीच्या कामातील दिरंगाईबद्दल ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
नांदगाव व नवीन नांदगाव या दोन गावांना जोडणारा हा पूल कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. या पुलावरून जाणारा रस्ता पुढे अनेक गावांना जोडत सांगली जिह्याला जाऊन मिळतो. त्यामुळे यावरून अलिकडच्या काळात वाहतूक वाढली आहे.
गतवर्षी आलेल्या पुरामुळे प्रथमच या पुलावरून पाणी गेले. गावात पाणी गेल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. दरम्यान, पुरामुळे पुलाच्या संरक्षक ग्रील तुटून वाहून गेले. परिणामी वाहतूक धोकादायक बनली; तरीही ती सध्या सुरुच आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनपातळीवर प्रयत्न झाले आहेत. मात्र प्रत्यक्ष दुरुस्ती झालेली नाही. या दिरंगाईमुळे शनिवारी एकाचा बळी गेला.
दरम्यान, शामराव काळे यांचा पुलावरून पडून मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. दुपारी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी मृतदेह कराडला नेण्यात आला.