कोरोनाला रोखण्यासाठी सुरुवातीस केल्या गेलेल्या ‘टाळेबंदी’ (लॉकडाऊन) च्या काळात, घरी थांबण्याचे आव्हान आपल्यापैकी अनेकांनी स्वीकारले. घरातून कार्यालयीन काम, कुटुंबासोबत वेळ, छंद जोपासना आदि गोष्टी एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी सामाजिक माध्यमांवर पोस्ट होऊ लागल्या. पहिल्या टाळेबंदीनंतर परिस्थिती हळूहळू निवळेल अशी कुठेतरी आस होती. टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आला, तेव्हा ‘हे कुठपर्यंत चालणार?’ हा प्रश्न कितीही नाही म्हटले तरी मनात घर करून राहिला आहे. आज कोरोना संक्रमणाची भीती प्रत्येकाला भेडसावत आहे. सोबतच भविष्यातील आर्थिक चिंताही. सांप्रत काळात लोकांच्या मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न जेवढे समोर येत आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक भविष्यात उद्भवणार आहेत.
वृत्तवाहिन्यांवर लोकांनी केलेली गर्दी पाहताना चीड येणे, संताप होणे साहजिक आहे. प्राप्त परिस्थितीत ते असे का वागत असतील असा तटस्थपणे विचार करण्याची मनाला सवय लावून घेतली पाहिजे. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आणि ती वाढविल्यानंतर परराज्यातील स्थलांतरीत कामगारांची आपापल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बसस्थानकांवर उसळलेली गर्दी, त्यांच्या मनातील भीती, अनिश्चितता, असुरक्षिता दर्शविते. जीवनावश्यक आणि प्राथमिक सुविधा लोकांपर्यंत पोचल्यास काही प्रमाणात भावनिक सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होईल. अनेकदा लोकांना मदतीपेक्षाही ‘सोबत’ आणि ‘धीर’ देणारे शब्द जास्त ताकद देत असतात. टाळेबंदीमुळे दोन-तीन पिढय़ा शारीरिकदृष्टय़ा घरात एकत्रित राहत असल्यातरी प्रत्येकजण आपापल्या आभासी विश्वात दंग आहे. ई-लर्निंग असले तरी मुले सलग 5-6 तास त्यात गुंतणार नाहीत. त्यांचे सवंगडी आपापल्या घरात बंद आहेत. पालकांना पाल्य म्हणतील तेव्हा आणि तितका वेळ त्यांच्याबरोबर खेळता येत नाही. पालक आणि मुले दोघांचीही चिडचिड वाढत आहे. दुसरीकडे वृद्ध पालकांना आलेल्या साध्या शिंक आणि खोकल्यानेही मन धास्तावत आहे. ज्यांच्या घरात अपंग, मतिमंद, अंथरुणाला खिळलेले रुग्ण, मनोरुग्ण आहेत त्यांची अवस्था तर खूप बिकट आहे. अशा परिस्थितीत दिलासा ठरणाऱया सामाजिक संस्था, आधार गट, समूह यांच्यापासून कोरोनाने आपल्याला दूर केले आहे. याचा दृष्य-अदृष्य परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होणे खूप स्वाभाविक आहे. भविष्यात वेगवेगळय़ा वयोगटातील आणि वेगवेगळय़ा आर्थिक-सामाजिक स्तरातील लोकांना मोठय़ा प्रमाणावर मानसिक आरोग्य सेवा-सुविधांची आवश्यकता निर्माण होणार आहे. वर्तमानाची ‘नांदी’ ही क्षीण स्वरुपात असली तरी ऐकायला येत आहे.
टाळेबंदीच्या काळात जगभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना तीस टक्क्मयांनी वाढल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. भारतामध्ये, टाळेबंदीच्या काळात ‘मद्यपी’ असलेल्या पुरुष गटातून आत्महत्या, इतर घातक द्रव्यांचे सेवन यासारख्या घटना समोर येत आहेत. कुटुंबातील व्यक्तींचा अव्यक्त राग, चिडचिड हे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढण्याचे एक कारण आहे. संपूर्णपणे लॉकइन (टाळेबंदी उठवणे) होईल की नाही हे आता सांगणे तरी कठीण आहे. सण-समारंभ, उत्सव, लग्नकार्य, पर्यटन, फिल्म-टेलिव्हिजन इंड्रस्ट्री आदि उपक्रम आणि उद्योगधंद्यांशी निगडित केटरिंग, टॅव्हलर्स, मांडववाले, डेपरीवाले आदींचे रोजगार धोक्मयात येण्याची मोठी शक्मयता आहे. भविष्यात मागणी-पुरवठय़ाचे गणित बिघडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे अनेकजण बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. शाळा-महाविद्यालये बंद झाली आहेत. खेडय़ापाडय़ात तांत्रिक असुविधांमुळे कित्येक विद्यार्थी ई-लर्निंगपासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून दूर लोटले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत निर्माण होणारे नैराश्य, चिंता, अनिश्चिततेचे सावट मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पाडेल. परिणामी आत्महत्या, कुटुंब विघटन, चोरी-दरोडे, मानवी तस्करीसारख्या समाज विघातक प्रवृत्ती अक्राळ-विक्राळ स्वरुप धारण करतील.
कोरोनाच्या सावटाखाली जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केलेली आत्महत्या असो की नाशिक-अकोल्यातील नागरिकांनी केलेल्या आत्महत्या, साथीच्या आजारांचे मानसिक आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांचे हिमनगीय टोकच त्या दर्शवित आहेत. दुसऱया महायुद्धानंतर 1929 मध्ये जागतिक पातळीवर तीव्र नैराश्याची लाट पसरली होती. त्यावेळीही संपूर्ण जगभरात मोठय़ा प्रमाणावर बेकारीचे सावट पसरले होते. अशीच ‘ग्रेट डिप्रेशन’ची स्थिती आपण अलीकडेच येऊन गेलेल्या जागतिक मंदीच्या काळातही अनुभवला होती. कोरोनामुळे संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेवर गंडांतर येत आहे. ‘आरोग्य’ की ‘अर्थव्यवस्था’ या चक्रव्यूहात सर्वच देशांचे प्रमुख अडकले आहेत.
भारतातील लोकसंख्या, लोकसंख्या घनत्व, गरीबी आणि वैद्यकीय सेवांची अपुरी सुविधा पाहता केंद्र तसेच राज्य सरकारांकडून मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रथम प्राधान्य टाळेबंदीला दिले गेले. आपल्याकडे हजार लोकांच्या मागे असणारे डॉक्टर आणि खाटांचे प्रमाण हे 0.5 टक्के इतके आहे. विकसित राष्ट्रांकडे ते सात ते आठ पटीने अधिक आहे. कोरोना संक्रमणामुळे वाढत असलेल्या रुग्णांना उपचार करताना विकसित राष्ट्रांमध्ये वृद्धांना शेवटचे प्राधान्य देण्यात येत आहे. हाच भेदभाव वर्ण आणि आर्थिक स्तरावरही होताना दिसून येत आहे. काळे-गोरे, गरीब-श्रीमंत हे पूर्वग्रह उपचारांमध्ये आडवे येत आहेत. आपल्याकडेही कोरोनाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाल्यास अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्मयता नाकारता येत नाही. भेदभावाच्या अशा वागणुकीमुळे मोठय़ा प्रमाणावर द्वेष पसरेल. जोडीला व्हॉट्स अपवरून फिरणाऱया फसव्या चित्रफिती आणि श्राव्यफिती आगीत तेल टाकण्याचे काम करतील. तीव्र द्वेषभावनेतून सारासार विचार करण्याची बुद्धी/मानसिकता लोप पावलेली असते. त्यातून उद्भवू शकणाऱया जातीय हिंसा, दंगली, जाळपोळ, अत्याचारांच्या घटना समाज स्वास्थ्य धोक्मयात आणतील.
हे चित्र पालटायचे असेल तर आतापासूनच लोकांचे मानसिक आरोग्य संतुलित राखण्याकरिता पावले उचलणे गरजेचे आहे. सामाजिक शास्त्र ज्ञानशाखे अंतर्गत येणाऱया मानसोपचार आणि समाजकार्य शाखेतील शिक्षकांनी, समुपदेशनाचे गुणवत्तापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन उपलब्ध केल्यास, कार्यकर्त्यांची मोठी फळी समाजात निर्माण होण्यास मदत होईल. या कार्यात सेवानिवृत्त प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी आणि सेवारत कर्मचाऱयांनी आपापल्या वेळेनुसार योगदान दिल्यास भविष्यातील खूप मोठी हानी टळू शकेल. नुकतेच पुणे जिल्हा परिषदेने कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्या तयार करण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. ग्रा.पं. सदस्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट सदस्यांना त्यांनी या कार्यात सहभागी करून घेतले आहे. समज देऊनही न ऐकणाऱया पुरुषांचे पोलिसांच्या मदतीने अलगीकरण करण्यात येईल असेही म्हटले गेले आहे. कौटुंबिक वाद वा हिंसाचार रोखण्यासाठी समुपदेशन निश्चित स्वागतार्ह आहे. त्याला व्यावसायिक तत्त्वांची जोड देता आल्यास ते अधिक प्रभावकारी ठरेल. समाजकार्य, मानसशास्त्र, चिकित्सा आणि वर्तणूक शिक्षण शाखांसाठी ही चांगली संधी आहे. पुणे जिल्हा परिषदेचे हे प्रयत्न चांगले राबवले गेल्यास ‘समूहाच्या प्रश्नांची समूहाद्वारे सोडवणूक’ या धर्तीवर समूह विकास आणि समाज परिवर्तनाची नवी दिशा ठरेल.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव