पाटगाव/वार्ताहर
नाईकवाडी-शिवडाव ते गारगोटी(ता.भुदरगड) या मार्गाचे नव्याने रस्ता कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्या मध्येच मोठे खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक मुळे रस्त्यावर खडी चे प्रमाण जास्त झाल्याने गाड्या स्लिप होण्याचा धोका जास्त वाढला आहे यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे सध्या कारखान्याचा हंगाम चालू असल्याने उसाचे भरलेले ट्रक व ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून मोटर सायकल स्वरांनो जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे .
नागरिकांसह शेतकऱ्यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. मुख्य रस्त्यापासून १०० मीटरपर्यंत घरात धुळजात असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच शेतात असणाऱ्या काजू,आंबा, फणस,केळी या फळझाडांचे धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या तून चालू कामाच्या रस्त्यावर नियमित पाण्याचा शिडकावा करावा अशी मागणी होत आहे.
गारगोटी ते शिवडाव,नाईकवाडी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू असून सर्वत्र रस्त्याची उत्खनन व छोटी-मोठी पुले यांचे काम जोरात चालू आहे. तसेच या मार्गावर रस्त्याच्या कामावरील वाहतुकीची ट्रक ट्रॅक्टर चार चाकी वाहने टु व्हीलर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात चालू असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्यावरती सध्या पूर्वी चा रस्ता उखडून नवीन रस्ता करण्यासाठी मातीचे पिचिंग काम चालू आहे या मातीच्या रस्त्यावरून अवजड वाहने गेल्याने धूळ उडत असून या धुळीचा त्रास आजूबाजूच्या घरांसह शेतातील फळझाडांना होत आहे.फळ झाडे पूर्णतः धुळीने माखल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या घरांना तर धुळीचा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून काही लोकांनी आपली घरा भोवती ताडपत्री,कापड आदी गुंडाळून धुळी पासून वाचण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसते. तसेच आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे धूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात, श्वसननलिकेत जातात. अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. त्यामुळे या परिसरातून या रस्त्यावरती नियमित पाण्याचा शिडकाव करून होत असलेल्या फळझाडे,शेती,घरे यांच्या नुकसानी सोबत आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होत असल्याने ठेकेदार कंपनीने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.