काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची सरकारवर टीका
प्रतिनिधी / बेंगळूर
रात्रीची संचारबंदी जारी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा नव्हे; तर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांचा आहे. सामान्यज्ञान असणारी कोणतीही व्यक्ती असा निर्णय घेणार नाही, अशी कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मारली.
बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी शुक्रवारी पत्रकारांशी ते बोलत होते. संपूर्ण जगाचे लक्ष कर्नाटकाकडे आहे. रात्रीच्या वेळीच कोरोनाची लागण होते का?, रात्री 11 नंतर कोण रस्त्यावर फिरतो?, असे परखड प्रश्न उपस्थित करून डी. के. शिवकुमार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. यंदा संपूर्ण वर्ष नागरिकांची ससेहोलपट झाली आहे, असे असताना देखील सरकारने कोणाचीही मते जाणून न घेतला अचानकपणे नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय का घेतला? रात्रीची संचारबंदी लागू केल्यास कोरोनाची बाधा होत नाही?, असे उत्तर देणाऱयाचे फोटो आपल्याला द्या. त्यांचे फोटो आपण घरी लावू, असा टोमणाही शिवकुमार यांनी हाणला.
रस्ते, बाजारपेठसह इतर ठिकाणी दिवसा हजारो लोक फिरतात. कोठे कोणत्या प्रकारच्या खबरदारी उपाययोजना करणे आवश्यक आहे तेथे ते करावेत, गरजुंना औषधांचे वाटप करावे, सुविधा पुरवाव्यात. शहरात व्यवसाय करणाऱयांना करामध्ये सूट द्यावी, असे सल्ले त्यांनी सरकारला दिले.
कर्फ्यूबाबतचा निर्णय राजकीय नव्हे : डॉ. सुधाकर
नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय खूप विचारपुर्वक घेण्यात आला होता. हा राजकीय निर्णय नव्हता, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले आहे. काँग्रेस नेत्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, आपल्या सरकारने घेतलेल्या उत्तम निर्णयांमुळे राज्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. आतापर्यंत 97.5 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ 1.22 टक्के इतके आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जारी आहे. जर्मनीतही रात्रीची संचारबंदी लागू आहे. याचा अर्थ तेथील प्रशासनाला अक्कल नाही, असा होत नाही. अत्यंत विचारपुर्वक तेथील प्रशासनांनी निर्णय घेतला आहे. कर्नाटकातही खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.