हॉटेल, बार-रेस्टॉरंटच्या कठोर नियमांमध्येही शिथिलता ः कोरोना नियंत्रणासंबंधीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्य सरकारने विकेंड कर्फ्यूपाठोपाठ नाईट कर्फ्यूही मागे घेतला आहे. चित्रपटगृहे, जीम, स्विमिंग पूल वगळता हॉटेल, बार-रेस्टॉरंट, पबमध्ये ग्राहक प्रवेशासाठी असणारी 50 टक्के मर्यादा मागे घेण्यात आली आहे. ही नवी मार्गसूची सोमवारपासून लागू होणार असून त्याची मुदत 15 फेबुवारीपर्यंत असणार आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी दुपारी कोविड नियंत्रणासंबंधी बैठक झाली. बैठकीतील निर्णयानुसार सरकारने सुधारित मार्गसूची जारी केली आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी नवी मार्गसूची जारी केली असून रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत लागू असणारा नाईट कर्फ्यू सोमवार दि. 31 जानेवारीपासून रद्द करण्यात आला आहे.
राज्यातील हॉटेल, पब, क्लब, बार, रेस्टॉरंट या ठिकाणी ग्राहकांच्या प्रवेशाची 50 टक्के मर्यादा हटविण्यात आली आहे. 4 जानेवारी रोजी सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीमध्ये हॉटेल, बार-रेस्टॉरंटना क्षमतेच्या 50 टक्के जणांनाच प्रवेश देण्याची अट घातली होती. विकेंड कर्फ्यू हटविण्यात आल्यानंतर या आस्थापनांच्या मालकांनी ग्राहकांच्या उपस्थितीसंबंधी असणारी अट मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीची सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 टक्के क्षमतेचे प्रवेश देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.
चित्रपट मंडळाने देखील निर्बंध मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने ही मागणी फेटाळली आहे. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, रंगमंदिर, सभागृहे व सेमिनार होणाऱया ठिकाणी आसनक्षमतेच्या 50 टक्के जणांनाच प्रवेश देण्याची अट पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्विमिंग पूल, जीममध्ये देखील एका वेळेला क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शने यावरील निर्बंधही कायम ठेवण्यात आले आहेत.
धार्मिक ठिकाणी भाविकांच्या 50 टक्के क्षमतेने प्रवेश देण्याची अट शिथिल करण्यात आलेली नाही. मात्र, विवाह समारंभांसाठी असणारे कठोर नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार मोकळय़ा जागेवरील विवाह समारंभांमध्ये कमाल 300 जणांना तर बंदीस्त जागेवरील विवाह समारंभांमध्ये 200 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
बेंगळूर मेट्रो रेल्वेसह सार्वजनिक परिवहनमधील बसेसमध्ये आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांना प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. सचिवालयासह सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचा नियम मागे घेण्यात आला असून 100 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीसह कामकाज करण्याची सूचना देण्यात आली आहे.
बेंगळूरमधील शाळा उद्यापासून सुरू
बेंगळूर शहर जिल्हय़ातील शाळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन आठवडय़ांपासून बंद होत्या. या शाळा 31 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना मार्गसूचीचे पालन करून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.