रात्रीच्या संचारावरील निर्बंध रद्द – कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना परिस्थितीमुळे जारी करण्यात आलेला नाईट कर्फ्यू सरकारने मागे घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याने कोविड तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला होता. त्यानुसार दररोज रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. तो आता मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि राज्य आपत्ती निवारण कार्यकारी समितीचे अध्यक्ष पी. रवीकुमार यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रे नेहमीप्रमाणे कार्यरत होती. मात्र, रात्रीचा कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता. आता तो मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी संचार करण्यावर कोणतेही प्रतिबंध राहणार नाहीत. यापूर्वी रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत नाईट शिफ्टमध्ये कामावर जाताना आणि येताना कामगारांना आयडेंटी कार्ड दाखविणे सक्तीचे होते. मालवाहतूक आणि वैद्यकीय सेवेला मुभा होती. इतरांना रात्रीच्यावेळी विनाकारण फिरण्यावर निर्बंध होते. आता हे प्रतिबंध हटविण्यात आले आहेत.
घोडे शर्यतींना परवानगी
कोरोना मार्गसूचीचे पालन करत घोडे शर्यतीलाही परवानगी देण्यात आली आहे. घोडय़ांच्या शर्यतीमध्ये घोडेपालकही सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. शिवाय हॉर्स क्लबमधील आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देता येणार आहे. याआधी सरकारने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत घोडे शर्यतींचे आयोजन करण्यास परवानगी दिली होती.