पुणे / प्रतिनिधी :
मुंबईच जीवन वेगळे असून 24 तास मुंबई जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पाहू. आपण पुणेकर आहोत. नाईट लाईफबद्दल पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेण्याचा विचार करू, असे अजित पवार यांनी सांगितले.
पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार उरो रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध विषयावर संवाद साधला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यासाठीही ‘नाईट लाईफ’चा विचार होऊ शकतो, असे वक्तव्य केले. त्यावर पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांना पुण्यातील नाईट लाईफ सुरू करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नाईट लाईफ सुरू करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ही आदित्य ठाकरे यांची बातमी मी वाचली. मुंबईचे लाईफ वेगळे आहे. मुंबई कधी झोपत नाही असे नेहमी बोलले जाते. ती 24 तास जागी असते. हे आपण अनेकदा ऐकले आहे. त्यामुळे मुंबईबद्दल तसा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचा अनुभव काय येतो, हे पाहुया. त्या अनुभवातून जर काही निष्पन्न झाले, तर पुढचा विचार करू. लगेच इकडे सुरू झाले की इकडे सुरू करा, असे नसते. आपण पुणेकर आहोत, पुणेकरांचे वेगळे मत असू शकते. इथल्या एनजीओची वेगळी मते असू शकतात. त्याच्यामुळे पुणेकरांना मान्य होईल, अशा प्रकारचा तिथला अनुभव घेतल्यानंतर या गोष्टीचा विचार करू, असे सांगतानाच, मी सुरू करणार असेही म्हटले नाही आणि नाही देखील म्हटलो नाही, असे म्हणत अजित पवारांनी स्वतःची बाजू सुरक्षित केली.