ग्रामस्तांची तहसिलदारांकडे चौकशीची मागणी
वाळवा / वार्ताहर
नागठाणे ता. पलुस येथे २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये घोटाळा झाला असून, अनेक बेकायदेशीर व पुराची झळ न बसलेल्या कुटुंबांना पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट केले आहे, त्या बोगस पुरग्रस्त कुटुंबांचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात आलेली आहे. नागठाणे येथे झालेल्या या महापुराच्या बोगस पंचनाम्यावरुन गावात ग्रामस्त आणि प्रशासन यांचा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून करून बोगस पंचनामे रद्द करावेत व त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. बोगस पूरग्रस्त कुटुंबांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्तांनी पलुस तहसिलदार यांचेकडे केली आहे.
याबाबत पलुस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. केदार शिवाजी माने, अनिल यशवंत जठार, आप्पा बनसोडे, अनिल बनसोडे आदी ग्रामस्थांनी हे निवेदन दिले असून बोगस पंचनाम्याची चौकशी करावी. अशी मागणी गावकऱ्यांकडुनही होत आहे. नागठाणे येथील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असलेल्या एका मुस्लिम कुटुंबातील अनेक नावे या बोगस पंचनाम्यांच्या यादीमध्ये असून, महापुराच्या पंचनाम्यांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांनी उखळ पांढरे करुन घेतल्याचे समोर आले आहे. असा आरोप भाजपचे युवानेते जयवंत मदने यांनीही केला आहे. या बोगस पंचनाम्याची चौकशी नाही झाली तर २१ ऑक्टोबर पासून आपण उपोषण करू. असा इशारा नागठाणे ग्रामस्थांनी दिला आहे.
नागठाणे गावात काही व्यवसायिकांना महापुराची नुकसान भरपाई थोडीफार मदत मिळाली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक लोकांचे व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना पुरेशी मदत मिळाली नाही, अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, अनेक कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत. परंतु गावातील लाभार्थ्यांची यादी आहे ती बोगस यादी तयार कोणी केली, अधिकाऱ्यांच्यावर बोगस नावे यादीत घालण्यासाठी कोणी दबाव टाकला याची शहानिशा करावी व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर पलुसचे तहसीलदार कोणती भूमिका घेणार व कारवाई करणार याकडे नागठाणे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.