ऑनलाईन टीम / नागपूर :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूरमध्ये ‘जनता कर्फ्यू’ ची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता 25 आणि 26 जुलै असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ असणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत माहिती देताना संदीप जोशी म्हणाले की, उद्या आणि परवा दोन दिवस नागपूरमध्ये ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतः या कर्फ्यूचे पालन करावे. 27 ते 30 जुलै या कालावधीत लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आवाहन करणार आहेत. लॉक डाऊन लावणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे जनतेला आवाहन करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्या-परवा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असतील, जनतेने हा कर्फ्यू पाळावा. लॉक डाउन करायची वेळ आली तर तो अत्यंत कडक असेल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
ते म्हणाले, नागपूरमध्ये 31 तारखेला पुन्हा बैठक घेऊन लॉक डाउनबाबत निर्णय घेणार आहोत. तसेच त्यांनी यावेळी मेडिकल आणि दूध याशिवाय कोणी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे.