ऑनलाईन टीम / नागपूर :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आणि राज्य मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावरून आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी लगेचच अटक केली असून पोलीस उद्या त्याला मुंबईला घेऊन जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे ट्विट केल्याचा आरोप समितवर आहे. समीतविरोधात नागपुरातील नितीन तिवारी यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्याला पोलिसांनी 24 ऑक्टोबर रोजी राजकोट येथून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी त्याला 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्या पोलीस कोठडीची मुदत संपली. आणि त्याला कोर्टाने अखेरीस जामीन मंजूर केला.
समितने ठाकरे सरकारला औरंगजेब व पॉवरलेस सरकार तर आदित्य ठाकरे यांना पेंग्विन असे म्हटले होते. समित ठक्करचे ट्विटरवर 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट करणारा समित ठक्कर सोशल मीडियावर सक्रिय असून तो पदवीधर आहे.