करवीर तालुक्यातील ग्रामस्थांचा विरोध
प्रतिनिधी/ कोल्हापूर
प्रस्तावित नागपूर रत्नागिरी महामार्ग हा तालुका करवीर येथील पंचगंगा नदीच्या पूरबाधित क्षेत्रातून जात आहे त्यामुळे शिये परिसरातील काही गावांना पुराचा आणखी धोका पोहचू शकतो. त्यामुळे हा महामार्ग वळवण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केली.
ते म्हणाले, शिये येथील सर्वे नंबर 96 ते 98, 93 व 95 या सर्वे नंबरमध्ये दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा असतो. 2019 आणि 2021 ला आलेल्या प्रचंड अशा महापुरामुळे या सर्वे नंबरमध्ये 15 फुटाहून अधिक पाणी साचले होते. या पाण्यातच 15 जुलै रोजी महामार्गाचे रेखांकन करून मोजणीचे नंबर लावण्यात आलेले आहेत. या रेखांकनाला शेतकरी संघटनेने विरोध केला परंतु कार्यकर्त्यांना पोलिसी बळाचा वापर करून ताब्यात घेतले आणि रेखांकन पूर्ण केले.
हा महामार्ग झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरावा पडणार आहे. हजारो टन भराव पडल्याने पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात तूबणार आहे. कोल्हापूर शहरासह आंबेवाडी, प्रयाग चिखली, पुलाची शिरोली, कसबा बावडा आदिसह नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे. महापुराची तीव्रता आणखीन वाढून कोल्हापूर शहरातील महाराणा प्रताप चौकापर्यंत पाणी गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे येथील जनजीवन उध्वस्त होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींची विचार करुनच आम्हा या मार्गाला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊ दिला जाणार नाही असा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, वस्तविक हा महामार्ग इस्लामपूर, शिराळा, मलकापूर, सांगली या जवळच्या मार्गाने जाऊ शकत होता. त्यामुळे इंधन आणि वेळही वाचणार आहे. या परिसरात पुराचा धोका नाही. हातकलंगले, वाठार, वारणा, बोरपाडळे हा मार्ग सुद्धा विस्तृत आहे. यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी या मार्गाचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यातूनच राष्ट्रीय महामार्ग काढण्यात यावा आणि कोल्हापूरसह छोट्या गावांना महापुराच्या संकटातून वाचवावे असे आवाहन शिंदे यांनी केले.