पंतप्रधान मोदींचा भाजप लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना संदेश
कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी जनतेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे ठाम समर्थन करावे आणि लोकांचे प्रबोधन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाचे या कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसून मानवतेच्या आधारावर हा कायदा करण्यात आल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
विरोधी पक्ष हेतुपुरस्सर लोकांमध्ये या कायद्यासंबंधी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंसक आंदोलने करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये मिसळून या कायद्याची आवश्यकता आणि या कायद्यामुळे साध्य होणाऱया बाबी यांच्याबद्दल चर्चा करावी. लोकांचा या कायद्याला पाठिंबा असून विरोधी पक्षांची केवळ आरडाओरड सुरू आहे, असेही प्रतिपादन मोदी यांनी केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संसदेतील डावपेच ठरविण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यात रालोआचे बहुतेक घटक पक्ष उपस्थित होते. संसदेत विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे विचलित न होता त्यांचा सामना आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन बैठकीनंतर घटक पक्षाच्या एका सदस्याने केले. रालोआतील सदस्य पक्षांनी बोडो करार केल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदनही केले.