प्रतिनिधी /फोंडा :
नागरिकत्व दुरुस्ती कायदा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी रविवार 5 रोजी फोंडा शहरात भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशप्रेमी नागरिक या बॅनरखाली विविध संघटनांतर्फे ही रॅली काढण्यात येईल. सकाळी 9.30 वा. राजीव गांधी कला मंदिरपासून रॅलीला सुरुवात होईल व जुन्या बसस्थानकावर रॅलीची सांगता होईल. याठिकाणी होणाऱया जाहीर सभेत प्रा. दत्ता नाईक हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
रॅलीचे समन्वयक ऍड. रघुवीर वर्दे यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सुनील देसाई, नंदादीप नाईक, मोर्तू कुर्टीकर, के. के. चतुर्वेदी व दिना नाईक हे उपस्थित होते. रॅलीत विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे कार्यकर्ते, मंदिरांचे पदाधिकारी तसेच महिला संघटना, विद्यार्थी व इतर राष्ट्रप्रेमी नागरिक मिळून साधारण दोन हजार लोक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुनील देसाई यांनी दिली. केंद्र सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कुठल्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही. केवळ सरकारला विरोध करण्यासाठी देशभर अफवा पसरवून हिंसक आंदोलने पेटवली जात आहेत. पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेश या शेजारील राष्ट्रांमधून शरणार्थी म्हणून भारतात आलेल्या अल्पसंख्यांक हिंदू, सिख, बौद्ध, जैन, पारसी आदी धर्माच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा कायदा लागू होणार आहे. 31 डिसें. 2014 किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार आहे, अशी माहिती ऍड. वर्दे यांनी यावेळी केली. ज्या प्रकारे तिरंगा हातात घेऊन हिंसक आंदोलने केली जातात ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय मुस्लीम बांधवांची नागरिकत्व विषयावर दिशाभूल केली जात असून मुस्लीम बांधवांनी या कायद्याचा अभ्यास करून तो समजून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.