वार्ताहर/ कराड
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेले नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन हे नवीन कायदे धर्मावर आधारित असून यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला धोका पोहोचत आहे. केंद्र शासनाने हे कायदे मागे घ्यावेत. तसेच महाराष्ट्र सरकारने राज्यात हे कायदे लागू करू नयेत, यासाठी सोमवारी सकाळी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. हजारो मुस्लीम बांधवांसह विविध धर्मीय नागरिकांचा मोर्चात सहभाग होता.
भीम आर्मीच्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चात शहरातील विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला. हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर गर्दी उसळली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. मंगळवार पेठेतील जोतिबा मंदिर, कमानी मारूती मंदिर, चावडी चौक मार्गे मोर्चा मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकात आला. दत्त चौकातून मोर्चा नवीन प्रशासकीय इमारतीसमोर आला. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, राष्ट्रीय युवक काँग्रेस महाराष्ट्राचे सरचिटणीस शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफभाई पठाण, नगरसेवक फारूख पटवेकर, मोहसीन आंबेकरी, राजेंद्र माने, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, आप्पासाहेब गायकवाड, सादिक इनामदार व नागरिक उपस्थित होते. महिलांचाही सहभाग होता.
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा मंजूर केला आहे. मात्र या कायद्यामुळे देशाच्या ऐक्याला व अखंडत्वाला तडा जात असल्याने देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे. मात्र केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने हा कायदा लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशातील अनेक राज्यांनी नागरिकत्व कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारनेही हा कारदा लागू करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.