प्रतिनिधी/ सातारा
भारतीय जनतेमध्ये धर्माच्या आधारवर फूट पाडणाऱया व संविधानविरोधी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी साताऱयात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आम्ही सारे भारतीय नागरिक, जमियत उलेमा ए हिंद, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, वंचित बहुजन आघाडी, लेक लाडकी अभियान, परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत गांधी मैदानापासून सर्व संघटनांनी मंगळवारी मोर्चा काढला होता. मोतीचौक मार्ग सर्व संघटनेच्या पदाधिकारी हातात तिरंगा घेवून निघाले. यावेळी नही सहेंगे नही संहेंगे तानाशाही नही सहेंगे, संविधान बचाव देश बचाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, नागरिकत्व कायदा रद्द करा अशा घोषणा देण्यात आला. हातात फलक घेवून मोर्चात सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि मुस्लीम समुदायातील लोक मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर निवदेन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, 26 जानेवारी 1950 रोजी या देशाचे संविधान स्विकारत असतानाच आपण सर्व धर्म, भाषा, पंथ, लिंग, व प्रांताच्या व्यक्तींना एकसमान कोणत्याही भेदभावाशिवाय भारतीय म्हणून स्विकारले आहे. केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करून नागरिकत्व नाकारणे हा भारतीय राज्यघटनेशी द्रोह आहे. म्हणून आम्ही सर्व भारताचे नागरिक या कायद्याला तीव्र विरोध करत आहोत.
आजही या देशातील 13 कोटी नागरिकांकडे कोणतेही रहवासी प्रमाणपत्र नाही. स्वत:च्या हक्काचा निवारा तर लांबच राहिला. पण साध कोणत्याही ग्रामपंचायती व नगरपरिषदेच्या हद्दीत नोंद नाहीत. रेशन कार्ड नाही. पोटापाण्यासाठी भटकंतीशिवाय पर्याय नाही. यांनी नागरिक आहे. म्हणून कसे सिद्ध करावे ? उलट या उपेक्षित घटकांच्या गरिबीविरूद्ध चाललेल्या संघर्षाची जबाबदारी सरकारची आहे. या भारताचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले असताना तुम्ही नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्यावर कशी टाकु शकता ? यामुळे आम्ही सर्व भारतीय नागरिक या कायद्याला व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला प्राणपणाने विरोध करत आहोत.