भाजप नेते विजयवर्गीय यांचे विधान : पश्चिम बंगालवर पक्षाची नजर
कोलकाता/ वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने भाजपने व्यूहनीति आखण्यास प्रारंभ केला आहे. जानेवारीपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण विधान पक्षाचे महासचिव आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. राज्यातील ममता बॅनर्जी सरकारला शरणार्थींबद्दल सहानुभूती नाही. केंद्र सरकारने शेजारी देशामंधून आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी सीएए आणल्याचे विजयवर्गीय म्हणाले.
ममता बॅनर्जी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले सुवेंदु सरकार भाजपच्या वाटेवर आहेत. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्ष सोडून जाऊ पाहणाऱयांना मार्ग मोकळा आहे. पक्षविरोधी कारवाया अजिबात सहन करणार नसल्याचे ममतांनी म्हटले आहे. सुवेंदु हे राज्यातील प्रभावी नेते मानले जातात आणि त्यांचा दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत वाद सुरू आहे.
सरकार पडणार
सुवेंदु अधिकारी भाजपमध्ये सामील झाल्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार निवडणुकीपूर्वीच कोसळणार आहे. तृणमूल काँग्रेसला सोडू पाहणारे अनेक नेते असल्याचे भाजप खासदार अर्जुन सिंग यांनी म्हटले आहे.
ममता आक्रमक
ममता बॅनर्जी यांनी सुवेंदु यांचा थेट उल्लेख न करता पक्षातील असंतुष्ट नेत्यांना कठोर संदेश दिला आहे. सुवेंदु यांचे वडिल आणि काही अन्य नेत्यांशी ममतांनी चर्चा केली आहे. चर्चेद्वारे एखाद्याची नाराजी दूर करता येत असल्यास आपण तयार असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
सुवेंदु यांच्यासाठी दरवाजे बंद
भाजपमध्ये कधी सामील होणार हे सुवेंदु यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु सुवेंदु आता पक्षात नसल्याचे तृणमूल काँग्रेसने मानण्यास प्रारंभ केला आहे. तृणमूल काँग्रेस 11 डिसेंबरपासून जनसंपर्क मोहीम सुरू करणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते लोकांशी थेट संपर्क साधणार आहेत. राज्यात एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 294 विधानसभा मतदारसंघ आहेत.