अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्या भाषणादरम्यान गोंधळ : विरोधकांचा सभात्याग, भाजपकडून आक्रमक भूमिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीच्या मुद्दय़ावर गदारोळ झाला आहे. काँग्रेस, तृणमूल, माकप आणि राजद समवेत अन्य पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाला विरोध दर्शविला. ‘गोळय़ा झाडणे बंद करा, देश तोडू नका’ अशा घोषणा लोकसभेत देण्यात आल्या. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका मांडावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्या भाषणावेळी विरोधकांनी सभात्याग केला. अनुराग ठाकूर यांनी दिल्ली येथील एका सभेत देशद्रोहय़ांना गोळय़ा घालण्यात याव्यात अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांच्या सभेनंतर दिल्लीत निदर्शन स्थळानजीक गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. तर वर्मा यांनी शाहीन बागसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. विरोधी पक्षांनी राज्यसभेत या मुद्दय़ांवर त्वरित चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
लोकसभेत एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जामियाच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा मांडला आहे. जामियातील विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून यामागे सरकार असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. शासन या विद्यार्थ्यांवर अत्याचार करत आहे. एका मुलाने डोळा गमावल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जामियाचे विद्यार्थी निदर्शने करत आहेत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड प्रकरणी अनेकांना अटक केली आहे.
अधीर चौधरींचा आरोप
सर्वसामान्य नागरिक राज्यघटनेच्या रक्षणार्थ सीएए-एनआरसीला विरोध करत आहे. निदर्शक राज्यघटना हातात घेऊन, राष्ट्रगीत म्हणून या कायद्याला विरोध करत आहेत. पण निदर्शकांवर गोळय़ा झाडल्या जात आहेत. लोकांना निर्दयीपणे मारले जात असल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
अभिभाषणात दुरुस्ती व्हावी
तृणमूल काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात सीएए, एनआरसी आणि काश्मीरमधील निर्बंधांचा मुद्दा सामील नसल्याचा विषय मांडला आहे. अभिभाषणात दुरुस्ती करण्याची मागणी तृणमूलने केली आहे.
सीएए-एनआरसीला विरोध
संसदेकडून संमत नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाहय़ असल्याचा दावा करत विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी चालू महिन्यातच सुनावणी होणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱया मुख्यमंत्र्यांना एनपीआर लागू न करण्याचे आवाहन विरोधी पक्षांकडून करण्यात आले आहे.
तुमच्यासाठी पाक निर्माण केला!
असदुद्दीन ओवैसी यांच्यासारखे नेते कट्टरवादी शैक्षणिक संस्थांमध्ये देशाच्या विरोधात विष फैलावत आहेत. ‘तुमच्यासाठी पाकिस्तान निर्माण केला, आता आम्हाला सुखाने जगू द्या’ असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी ओवैसी यांना दिले आहे. ओवैसी आणि घटनाविरोधी घटकांना रोखावे लागणार आहे. भारतीय आता जागे झाले असून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करू नका, असे गिरिराज म्हणाले.