प्रतिनिधी / कागल
आपल्या सर्वांवर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. अशा पारिस्थितीत नागरिकांच्या आगतिकतेचा फायदा खासगी रुग्णालयांनी घेवू नये. विरोधकांनी आरोप करीत न बसता बाहेर येवून पीपीई किट घालून कोरोना उपचार केंद्रात जावून रुग्णांची विचारपूस करावी. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यावर शोधली जाणारी लस दृष्टीक्षेपात येत आहे. सध्या कोरोनावर उपचार करुन घेण्यासाठी लोक खासगी रुग्णालयात जात आहेत. मात्र ही रुग्णालयामध्ये रुग्णांकडून वारेमाप बिले घेतली जात आहेत. ही बाब भूषणावह नाही. लोकांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेणे योग्य नाही. मोठी बिले आकारून खासगी रुग्णालयांनी गैरफायदा घेऊ नये. रूग्णांवर माफक दरात उपचार करून, डॉक्टरांनी परमेश्वराचा आशिर्वाद घ्यावा.
ते म्हणाले, कोरोना आला त्यावेळी राज्यात केवळ दोन टेस्टींग लॅब होत्या. आता २०० आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. जगात आरोग्याच्या बाबतीत आघाडीवर असलेली राष्ट्र कोरोनामुळे गोंधळून गेली आहेत. राज्यात मुख्यमंत्री आणि सरकार नवीन असतानाही चांगले काम केले आहे. कोरोनामुळे तरूण दगावत आहेत ही बाब चिंताजनक आहे. शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गेली सहा महिने शासकीय यंत्रणा अव्याहातपणे काम करत आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना आजारातून मुक्त होऊन पुन्हा सेवा बजावत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
जिल्हा परिषदेत औषध खरेदी तक्रारीबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, औषध खरेदीसाठी मंत्री-पदाधिकारी कमिटी नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,आयुक्त, जिल्हा शल्यचिकीत्सक आदींची कमिटी आहे. हा सरकारी मामला आहे. ऑडीट होणार आहे. पै- पैचा हिशोब कमिटीला द्यावा लागणार आहे. याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर आहे. विरोधकांनी या संकट काळात आरोप करण्यापेक्षा एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे.
जिल्हा परीषदेच्या मागील पदाधिकाऱ्यांचा कारभार चर्चेत आहे. यावर आपले लक्ष आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत पालकमंत्री सतेज पाटील व आपण बैठक घेणार आहोत . व्हीसीद्वारे बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत .
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या बातम्या आलेल्या आहेत. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या अशा प्रकरणांमध्ये भाग घेण्यात मला रस नाही. त्यांच्याबद्दल जी तक्रार केलेली आहे ती चुकीची केलेली आहे. असे मला वाटते. स्वतःला क्लीनचिट मिळवण्यासाठी कदाचित चंद्रकांत पाटलांनी त्यांना तक्रार करायला लावली असेल. जनतेने निवडून दिलेल्या माणसाला त्रास देणारा मी व्यक्ती नाही, असे ते म्हणाले.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.