प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील पाणीपुरवठय़ाची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपट्टीची बिले देण्यास दोन महिने विलंब झाला होता. मात्र अलीकडे एल ऍण्ड टी कंपनीने बिले देण्यास प्रारंभ केला असून वाढीव बिले देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाणीपट्टीच्या दरात वाढ झाली का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर अलीकडेच सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. अशातच वाढीव पाणी बिले देण्याचा सपाटा सुरू आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बिले देण्यात आली होती. पाणीपुरवठा मंडळाकडून दोन महिन्याला बिले देण्यात येत होती. तर प्रत्येक महिन्याला 175 रुपये तर 24 तास पाणीपुरवठा योजनेतील बिले मीटर रिडिंगनुसार देण्यात येत होती. प्रतियुनिट साडेसात रुपयेप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात बिल देण्यात आले होते. मात्र अनगोळ भागात पुन्हा पंधरा दिवसांनंतर नोव्हेंबर महिन्यात बिले देण्यात आली आहेत. तसेच नियमित वापरापेक्षा जास्त युनिट असल्याचे निदर्शनास आले आहे. नोव्हेंबर महिन्यात देण्यात आलेले बिल प्रतियुनिट 10 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पाणीपट्टीत 25 टक्के वाढ झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही नळधारकांची बिले दुप्पट आल्याने नेमका प्रकार काय आहे? अशी विचारणा होत आहे.
वास्तविक पाहता नळधारकांना दोन महिन्याला साडेतीनशे ते चारशे रुपये बिल येत असे. पण सध्या वाढीव बिले आल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू झाली नाही. पण वाढीव बिले देण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच दोन महिन्यातून एकदा देण्यात येणारी बिले आता पंधरा दिवसाला देण्यात येत असल्याने नेमका गोंधळ काय? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
अचानक वाढीव बिले येण्यामागचे गौडबंगाल काय?
बिले देणाऱयांकडे विचारणा केली असता व्यवस्थित माहिती मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात संपर्क साधला असता कोणीच प्रतिसाद देत नाही. विचारणा करण्यासाठी तसेच पाणीपुरवठय़ाबाबत तक्रार करण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अचानक वाढीव बिले येण्यामागचे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.