प्रत्येकाच्या घरात पल्स ऑक्सिमीटर आवश्यक
प्रतिनिधी/सातारा
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढल्याने आणि त्यातच रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा पडल्याने वातावरण पॅनिक झाले आहे. मात्र, रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी करत आली असून दोन, तीन दिवसात त्याचा साठा उपलब्ध होईल. मात्र, ज्यांना खरंच रेमडिसीवीर इंजेक्शनची गरज आहे त्यांनाच ते फिजीशियनच्या सल्लाने रेफर करावे. तसेच ज्यांना काही लक्षणे जाणवत असतील त्यांनी लक्षणे अंगावर न काढता जवळच्या डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथील डॉक्टर्संकडून तपासण्या, उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोनाची परिस्थिती गंभीर होवू लागलीय. गतवर्षी 15 सप्टेंबरला सर्वात उच्चांकी 1,017 एवढी उच्चांकी बाधित संख्या आली होती. गेल्या दोन दिवसात तीच उच्चांकी बाधित वाढ समोर आलीय. अशा परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळून या स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. पूर्वी खोकला, ताप, सर्दी, अंगदुखी अशी लक्षणे कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिसून येत होते. आता विशेषतः वयोवृध्द बाधितांमध्ये उलटय़ा, जुलाबाची लक्षणे दिसू लागलीत तर ज्येष्ठांसह, तरुणांमध्ये थकवा येत असल्याची लक्षणेही जाणवत असल्याचे समोर आलेय.
लक्षणे अंगावर काढू नका, उपचार घ्या
काही नागरिक भीतीपोटी काही त्रास होत असल्यास डॉक्टरकडे जाण्याचे टाळत आहेत. मात्र, त्यांनी तसे न करता काही लक्षणे वाटत असल्यास लगेच डॉक्टरकडे जावे. तिथे तपासणी करावी. काही आढळले तर त्यामुळे तातडीने व लवकर उपचार मिळतील. काही वयोवृध्द रुग्ण उशिरा येत असल्याने दुर्देवाने बळींची संख्या वाढू लागलीय. हे टाळण्यासाठी लवकर निदान, लवकर उपचार या पध्दतीने रुग्ण बराही होतो व पुढील धोकाही टळतो. त्यामुळे लक्षणे अंगावर काढू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेय.
प्रत्येक घरात पल्स ऑक्सिमीटर आवश्यक
सर्वसाधारण ऑक्सिजनची लेवल 94, 95 असणे आवश्यक आहे. जर ती त्यापेक्षा खाली असेल तरी तपासणी व उपचारांची गरज आहे. मात्र, ऑक्सिजन चेक करण्यासाठी प्रत्येक घरात पल्स ऑक्सिमीटर आवश्यक असून त्याची किंमतही आता कमी झालेली आहे. ज्येष्ठांनी सहा मिनिटे चालून ऑक्सिनज पल्स ऑक्सिमीटरवर पातळी चेक करावे तसेच इतरांनी एक मिनिट बैठका मारुन मग नंतर ऑक्सिजन पातळी चेक करावी. कधीतरी ऑक्सिजन पातळी कमी आली की घाबरुन जावू नका. अनेक वेळा करा, त्याच्या नोंदीही ठेवा व त्यानंतर निर्णय घ्या.
धोका टाळण्यासाठी हे आवश्यकच
लवकर निदान, लवकर उपचार हे अतिशय आवश्यक आहे. कारण काही लक्षणे असल्यास पहिल्याच दिवशी जर रुग्ण डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरांना निर्णय घेणे सोपे जाते. जर निदान लवकर झाले तर लगेच उपचार सुरु झाल्याने धोकाही टळतो. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्गातील नियम काटेकोरपणे पाळताना काही लक्षणे दिसल्यास तातडीने लगेच आपल्या फॅमिली डॉक्टर, शासकीय हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा सेविकांशी संपर्क साधावा. त्यामुळे वेळीच निदान झाल्यास वेळीच उपचार मिळतील, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
इतर व्याधींची औषधे टाळू नका
जे ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांना इतर काही ब्लडप्रेशर, शुगर वा आणखी काही व्याधी असतील त्यांनी त्यांच्या व्याधीवरील औषधे वेळेवर सुरुच ठेवावीत. जर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, उलटया, जुलाब अशी लक्षणे आढळली, सातत्याने थकवा जाणवत असल्यास त्यांनी त्यांच्या डॉक्टर्संची भेट घेवून तपासणी करणे आवश्यक आहे. भिऊ नका, काळजी घ्या हीच सध्याची गरज असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
रेमडिसीवरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा
रेमडिसीवीर इंजेक्शनचा वापर हा फिजिशियनच्या सल्लानुसार आवश्यकता वाटत असल्यास करावयाचा आहे. नातेवाईक, रुग्ण यांच्या दबावाखाली येवून या इंजेक्शनचा वापर करु नका असे सांगतानाच आयसीएमआयच्या गाईड लाईनप्रमाणेच डॉक्टर्संनी त्याचा वापर करावा असे सांगितले आहे. वितरण साखळीतील दोषामुळे सध्या रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुडवटा आहे. मात्र, लवकरच दोन, तीन दिवसात पुरवठा सुरळीत होणार आहे. त्याची मागणीही नोंदवण्यात आलेली असून खासगी डॉक्टर्संना ते उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासगी डॉक्टर्संनी देखील त्यांच्या कंपनींकडून याबाबत पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.