ऑनलाईन टीम / पुणे :
प्रभागातील विकास कामे योग्य पद्धतीने मार्गी लागावीत वा नागरिकांना अपेक्षित कामे व्हावीत यासाठी नगरसेवक व नागरिक यांच्यातील संवाद महत्वाचा असल्याचे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. प्रभागातील नागरिकांना नेमके काय हवंय ते समजून घेऊन त्याप्रमाणे विकासनिधी चा विनियोग केल्यास प्रभागात आवश्यक असलेल्या गोष्टींवर खर्च होईल व योग्य पद्धतीने विकास होईल असेही ते म्हणाले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व प्रभाग 13 मधील सर्व नगरसेवक नागरिकांना अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे नागरिक सांगतात, हे परस्पर समन्व्य वा संवादातूनच शक्य होते असेही ते म्हणाले. शिक्षण मंडळ अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नव्याने तयार केलेल्या कारंज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने असलेल्या पटवर्धन बागेतील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नागरिकांना आल्हाददायक वाटेल अश्या पद्धतीने हे नयनरम्य कारंजे उभारले असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. विविध विकासकामे करत असतानाच नागरिकांच्या मानसिक गरजा ही भागविल्या पाहिजेत वा त्यांना बागांमध्ये संचार करताना मनःशांती मिळावी या दृष्टीने प्रभागातील सर्व बागांमध्ये विविध विकास कामे केली असल्याचे ही सौ. खर्डेकर म्हणाल्या. यावेळी महापौरांच्या हस्ते स्थानिक वृक्ष व महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणं लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,महिला मोर्चा शहर सरचिटणीस गायत्री भागवत, श्यामाप्रसाद उद्यानात दैनंदिन योग व अन्य क्रिया करणारे नागरिक उपस्थित होते. यावेळी कारंजे उभारणारे संतोष शिंदे, संदीप कापरे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.