मंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार : नाटय़संस्थेच्या अमृत महोत्सवाची सांगता
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
नाटक ही आपली परंपरा आहे. दिडशे वर्षांपेक्षा अधिक काळ हा गोमंतकामध्ये नाटकांचा सुवर्णकाळ म्हणून गणला जातो. पोर्तुगीज आमदानीतही येथील कलाकारांनी रंगभूमी जोपासली. नाटय़ हा गोमंतकीयांच्या जिव्हाळय़ाचा विषय असून गोव्याच्या मुक्तीसंग्रामातही ही कला टिकविण्याचे काम ज्या नाटय़संस्थांनी केले, त्यापैकीच श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़मंडळ ही एक आहे. त्यामुळे आज ऐन बहरात असलेली ही जुनी नाटय़संस्था अभिनंदनास पात्र आहे, असे उद्गार वीजमंत्री तथा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सुदिन ढवळीकर यांनी काढले.
श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़संस्थेच्या अमृत महोत्सवी समारोप सोहळात ते बोलत होते. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर मडगाव गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष तथा नाटय़ समिक्षक जनार्दन वेर्लेकर, महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष हर्षद कामत, आयोजन समितीचे अध्यक्ष अजित केरकर व सचिव अरुण काळे हे उपस्थित होते. मंत्री ढवळीकर पुढे म्हणाले, कुठल्याही संस्थेचे भावितव्य उज्ज्वल व्हायचे असल्यास संस्थेशी निगडीत कार्यकर्ते समर्पित भावनेने आणि एकमताने वावरले पाहिजेत. सुदैवाने नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़संस्थेला गवसलेले सगळेच कलाकार आणि कार्यकर्ते संस्थेचे हित नजरेसमोर ठेऊनच कार्यरत राहिले. प्रसंगी त्याग आणि पदरमोड करुन त्यांनी संस्था संवर्धीत केली. परिणामी आज ही संस्था पाऊणशे वर्षांची झाली आणि शतकाकडे मार्गक्रमण करीत आहे.
जनार्दन वेर्लेकर म्हणाले, अमृत महोत्सव साजरा करणारी संस्था हे संघटनात्मक कार्याचे प्रतिक असून अनेक माणसांच्या योगदानाचे ते फलीत आहे. तन मन अर्पून समर्पणाच्या उद्देशाने पुढे जाणाऱया संस्थांचे सदस्य आणि मार्गदर्शक हेच त्या संस्थांचे बळ असते. नागेश महालक्ष्मी प्रासादिक संस्थेचे महान आदर्श आजच्या पिढीसमोर ठेवलेला आहे. त्यामुळेच नावारुपाला आलेली ही संस्था संपूर्ण गोव्यासाठी भूषण ठरली आहे. हर्षद कामत यांचेही भाषण झाले. नाटय़संस्थेच्या कार्यात योगदान दिलेल्या एकूण 57 कलाकारांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. बाल कलाकारांचाही त्यात समावेश होता. अजित केरकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नाईक यांनी तर अरुण काळे यांनी आभार मानले. त्यानंतर राजीव गांधी कलामंदिरच्या संगीत नाटय़ स्पर्धेतील विजेत्या नाटय़संघाने ‘रणदुदुंभी’ हा नाटय़प्रयोग सादर केला.