आमचा मित्र नागजंपी ऊर्फ नाग्या परवा परवापर्यंत पट्टीचा पिणारा होता. तो अचानक निर्व्यसनी झाला. पुढारी लोक काँग्रेसमुक्त भारत किंवा भाजपमुक्त भारत म्हणतात नं, तसा नाही. नाग्या खरोखरच व्यसनमुक्त झाला. मी कुतूहलाने वहिनीपाशी चौकशी केली तेव्हा मला समजलं ते असं.
पूर्वी नाग्या मित्रांसोबत मद्यपान करायचा तेव्हा सगळेजण सीडी प्लेअरवर हिंदी सिनेमातली प्रेमभंगवाली गाणी ऐकायचे. त्यात दर्द, गम वगैरे शब्दांचा भडिमार असतो. नायक-नायिकेची ताटातूट झाली की दोघांपैकी एकजण तरी अशी गाणी गातो. शिवाय गायकांनी गायिलेल्या गझलांच्या रेकॉर्ड्स… नाग्या आणि त्याचे मित्र या सर्व रचना ऐकत. शब्दांचे अर्थ किंवा रागदारी समजली नाही तरी ‘!क्मया बात है!’ म्हणून दाद देत.
नाग्या रिटायर झाला. त्याच सुमारास मुन्शिपाल्टीने शहर स्वच्छ आणि स्मार्ट बनवण्याचा घाट घातला. सार्वजनिक भिंतीवर रंगीत चित्रे आणि शहर स्वच्छ ठेवण्याच्या घोषणा रंगवून झाल्या. अनेक नागरिक घरातला ओला आणि सुका कचरा वेगळा करून दाराशी आलेल्या घंटागाडीत टाकू लागले. नाग्याच्या घराजवळ मनपाची आरोग्य कोठी आहे. तिथे सकाळपासून वेगवेगळय़ा कचरा गाडय़ा जमतात.
एका संध्याकाळची गोष्ट. नाग्याला मद्यपानाची हुक्की आली. त्याने फडताळातून काजू काढले. बाकीचा सरंजाम काढला. मग त्याने मोबाईल उघडून यू टय़ूबवर एक गाणं लावलं. पण अर्धी ओळ ऐकून ‘हट’ म्हणून ते बंद करून दुसरी गझल लावली. तिचा देखील पहिला शेर पूर्ण न ऐकता स्वतःशी शिवी हासडली आणि बंद करून तिसरं दर्दभरं गाणं लावलं. पुन्हा तेच. पाचेक मिनिटं नाग्या असा गाणी निवडत आणि बंद करीत राहिला. शेवटी त्याने रागाने मोबाईल खाली आपटला. उठून उभा रहात त्याने समोरचा ग्लास सिंकमध्ये ओतला. शिसा कचऱयाच्या पेटीत टाकला.
“काय झाले?’’ नंदिनी वहिनीनं नम्रपणे विचारले.
“अगं हे मुन्सिपाल्टीचं लोक, सगळय़ा चांगल्या गाण्याचं चाल वापरून त्यांनी नवीन गाणी रचलेलं. ओला कचरा-सुका कचरा… आपलं शहर स्वच्छ करा… कोणतंही चांगलं गाणं-गझल लावलं तरी त्या चालीवरचं कचऱयाचं गाणं आठवतं. बस्स. आजपासून नको ते गाणं आणि नको ते पिणं,’’ साश्रू नयनांनी नाग्या उत्तरला.
शहर स्वच्छ होईल तेव्हा होईल. नाग्याचा संसार मात्र स्वच्छ झाला. त्यांच्या घरातून दारू आणि गाणी कायमची हद्दपार झाली!