कर्नाटक विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आहे. 4 ते 31 मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार होते. एक आठवडा आधीच ते गुंडाळावे लागले आहे. मस्की, बसवकल्याण विधानसभेच्या पोटनिवडणुका व बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱया पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचाराची धुरा सांभाळायची आहे. हे एक कारण तर दुसरे कारण माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासंबंधीच्या कथित सीडी प्रकरणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तब्बल तीन दिवस विधानसभेत धरणे धरले. विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरलेल्या मुदतीच्या आधी गुंडाळावे लागले. कारण बुधवार दि. 24 मार्चपासून विधिमंडळात दिवसरात्र धरणे धरण्याचे काँग्रेसने ठरविले होते. त्यामुळेच सरकारला अधिवेशन गुंडाळावे लागले.
खरेतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चेची अपेक्षा असते. सत्ताधाऱयांपेक्षाही विरोधी पक्षावर मोठी जबाबदारी असते. सरकारचे काही चुकले तर नाक दाबून तोंड उघडायला लावायचे असते. सीडी प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्यामुळे अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावरील चर्चा बाजूला पडली. 4 मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याच्या दोन दिवस आधी 2 मार्च रोजी सीडी प्रकरणाला सुरुवात झाली. संपूर्ण अधिवेशनावर त्याचे सावट राहिले. सुरुवातीचे दोन दिवस सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या महत्त्वाच्या मुद्दय़ावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने हा मुद्दा खोडून काढत चर्चेत भाग घेतला नाही. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आता विरोधक सरकारला धारेवर धरणार. आर्थिक तरतुदी, कर्ज, दरडोई उत्पन्न आदी मुद्दय़ांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार, अशी अपेक्षा होती. 22 मार्च रोजी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सीडी प्रकरणावर स्थगन प्रस्ताव मांडला. सभाध्यक्षांनी नियमांतर्गत यावरील चर्चेला मान्यता दिली.
कथित सीडी प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीचे अधिकारी करीत आहेत. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जावी. या प्रकरणी माजी मंत्र्यांवर बलात्काराचे प्रकरण दाखल करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसने धरणे धरले. तीन दिवस काँग्रेसचे धरणे सुरू होते. तिसऱया दिवशीपासून दिवसरात्र धरणे धरण्याचे विरोधकांनी ठरविले होते. त्याला आणखी एक कारण म्हणजे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर, मंत्री शिवराम हेब्बार, एस. टी. सोमशेखर आदींसह सहा मंत्र्यांनी आपल्याविरुद्ध प्रसारमाध्यमांनी अवमानकारक मजकूर छापू नये, दाखवू नये म्हणून न्यायालयाकडून मनाई आदेश आणला आहे. या सहा मंत्र्यांवर मनाई आदेश आणण्याची वेळ का आली? याचाच अर्थ तुम्ही काही तरी खाल्ले आहे आणि आता तुम्हाला खवखवत आहे, असा होतो. म्हणून या सहा मंत्र्यांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधकांनी केली. सीडी प्रकरणाबरोबरच सहा मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर विरोधी पक्षांचा दबाव वाढला. ज्या सहा मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढविला होता, ते ‘ऑपरेशन कमळ’च्या गळाला लागलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस-निजदचे होते.
सीडी आणि सहा मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने दबाव वाढवताच आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी सभागृहाबाहेर केलेल्या वक्तव्यामुळे केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारी आमदारही संतापले होते. सीडी प्रकरण आणि न्यायालयातून मनाई आणणाऱया मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे काँग्रेस-निजद नेते एक पत्नी व्रती आहेत का? सर्व 224 आमदारांची चौकशी करा, तुम्ही तुमच्या जीवनात अनैतिक संबंध ठेवले नाहीत का याची चौकशी होऊ द्या. चौकशीतून तुमचे एक पत्नी व्रत सिद्ध करा, असे जणू आव्हानच त्यांनी दिले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा नैतिकता, अनैतिकता, एक पत्नी व्रत आदींकडे चर्चेचा सूर वळला. भाजपमधील आमदारांनीही त्यांच्यावर टीका करताच त्याच दिवशी सायंकाळी मंत्री सुधाकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी या मुद्दय़ावरील भडका शांत होईल, असे वाटत नाही. गुरुवारी काँग्रेसमधील महिला आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोग्यमंत्री नव्हे तर अनारोग्य मंत्री आहेत, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे धरण्याचाही प्रयत्न झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामी, माजी केंद्रीय मंत्री मुनियप्पा, माजी मंत्री रमेशकुमार, डी. के. शिवकुमार हे सत्य हरिश्चंद्र आहेत का? ते साऱयांना आदर्शवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीला सामोरे गेल्यास प्रत्येकाचे भांडवल बाहेर पडेल, असे उघड आव्हान त्यांनी दिले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एकीकडे कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. दुसरी लाट येणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या विषयावर विधिमंडळात चर्चा होणार, दुसरी लाट रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविली जाणार, अशी अपेक्षा सामान्यांनी करणे स्वाभाविक आहे. मात्र, ही अपेक्षा फोल ठरवत सत्य हरिश्चंद्र, मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या चरित्रांवर चर्चा करीत एका प्रकरणावरून साऱयांनाच लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न झाला आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे. सुधाकर यांच्या म्हणण्यानुसार सारेच क्यभिचारी आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एक पाऊल पुढे जात कुमारस्वामी यांनी माझ्या हातून एकदा चूक झाली आहे. उघडपणे आपण त्याची कबुलीही दिली आहे.
माणूस म्हटले की या ‘नाजूक’ विषयावर तो कधी ना कधी वाहवत जातो. जो सापडतो तो चोर ठरतो, पण जो सापडत नाही तो शुद्ध आहे असे नाही. असे सांगत राजकारणातील विदारकतेवर त्यांनी जणू प्रकाशच टाकला आहे. ज्यांच्यावर हा निशाणा होता त्या डी. के. शिवकुमार यांनी तर आपल्याला एकच पत्नी आहे. एकच संसार आहे, असे जाहीर केले आहे. कर्नाटकात सध्या पिण्याचे पाणी, कोरोनाची दुसरी लाट आदी मुद्दे गौण ठरून ‘हमाम में सब नंगे’ यावरच गावगप्पा रंगल्या आहेत.