चिपळुणातील नाटय़प्रेमींच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या प्रवेशद्वारावरच 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता दिवाळी पहाट साजरी करण्याचा निर्णय रविवारी पारावर झालेल्या नाटय़प्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच रखडलेल्या नाटय़गृह उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर दर रविवारी सायंकाळी 5 वाजता विविध कार्यक्रम घेऊन राजकारण्यांना लाजवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
2005 साली आलेल्या महापुराचा फटका बसल्यापासून हे सांस्कृतिक केंद्र गेली 15 वर्षे बंद आहे. त्यामुळे यासाठी सुमारे 8 कोटी रूपये खर्च करून नगर परिषद गेल्या काही वर्षापासून त्याची दुरूस्ती करीत आहे. आता या केंद्राचे काम पूर्ण झाले असून त्याचे कधीही उद्घाटन होऊ शकते. असे असतानाच यात राजकारण आडवे आल्याने लवकर उद्घाटन होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे चिडलेले नाटय़प्रेमी आता उद्घाटन होवो ना होवो आपण कार्यक्रम करायचेच या निर्णयापर्यंत आले आहेत. यातूनच रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे छोटेखानी कार्यक्रम व दीपोत्सव करून दिवाळी पहाट साजरी करण्याचा निर्णय घेतानाच त्यानंतर दर रविवारी सायंकाळी 5 वाजता अन्य कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे आता येथे वेगळेच नाटय़ रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारण्यांबाबत तीव्र नाराजी
यावेळी उपस्थित नाटय़प्रेमींनी काही राजकारण्यांनीच आम्हाला केंद्र कधी सुरू करताय, असा टोमणा मारत आहेत. यावरून तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी आम्ही केंद्र सुरू होऊ देणार नाही असा जणू ते संदेशच देत आहेत. यावरून त्यांना राजकारणापलिकडे काहीही दिसत नसल्याचे स्पष्ट होत असून त्यांनी आपल्या भूमिकेचा विचार करून जनाची नाही तरी मनाची तरी लाज ठेवावी अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली.
भैरीबुवाला साकडे
चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्याच राजधानीत आता ही चळवळ संपते की काय, अशी भीती व्यक्त करतानाच असा प्रयत्न करणाऱयांना सुबुध्दी दे आणि केंद्र सुरू करून नाटय़प्रेमींची होणारी परवड थांबव, असे साकडे या बैठकीदरम्यान भैरी बुवाला घालण्यात आले.
अल्प प्रतिसाद
गेल्या काही वर्षापासून या क्ंाsढद्राचे तत्काळ उद्घाटन व्हावे म्हणून नाटय़प्रेमी विविध मार्गांनी आंदोलन करत राजकारण्यांसह नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे रविवारी बैठक घेण्याचे ठरवून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या बैठकीकडे राजकारणी फिरकले नाहीतच, पण नाटय़पेमींनीही पाठ फिरवली. याबाबत व्हॉटस्अप, फेसबुवर विषय येताच सर्वजण त्याला लाईक करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कधीही हाक द्या, आम्ही येऊ असे हजारो नागरिक सागतात. मात्र वेळ आली की सर्वजण मागे जातात ही भूमिका योग्य नसून याबाबतही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी कणक संस्थेचे भाऊ कार्ले, सतीश कदम, योगेश बांडागळे, संतोष केतकर, सुनील जोशी, अभय दांडेकर, दिलीप आंब्रे, कैसर देसाई आदी उपस्थित होते.