केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेद्वारे आग्रही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शिवसेनेने विरोध दर्शवलेल्या नाणार रिफायनरीचा प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्र सरकारच्या माध्यमातून आग्रही असल्याचे समोर आले आहे. हा रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत व्हावा जेणेकरून येथील बेकारी कमी होईल. त्यामुळे नाणारचा रिफायनरी प्रकल्प आम्हांला हवाच असल्याचे प्रतिपादन मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. कोकणात औद्योगिक प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत भाजपाच्यावतीने आयोजित जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी येथील अनेक विकासात्मक गोष्टींवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदी घेतले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेली विकासात्मक कामे जनतेसमोर मांडून जनआशीर्वाद घेऊन त्याचा अहवाल मोंदींसमोर ठेवणार असल्याचे राणे यांनी सांगितले. कोकणातील जनतेचे प्रश्न, महापूर, वादळ या परिस्थितीत येथील जनतेला मदत, त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ही यात्रा असल्याचे सांगितले.
शिवसेनेने कोकणाला काय दिले?
गेल्या 2 वर्षात शिवसेनेने कोकणाला काय दिले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जिल्हा परिषद दिवाळखोरीत आहे, पुनर्वसनाचे काम बाकी आहे. रत्नागिरीची अवस्था दयनीय बनली आहे. शिवसेनेचा हा कारभार जनतेला दाखवून देणार असल्याचे मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
कोकणात औद्योगिक प्रगतीसाठी आपण काम करणार आहे. त्यासाठी या ठिकाणी छोटे-छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या माध्यमातून लाभार्थ्यांना 35 ते 90 टक्के सबसीडीच्या योजना राबवल्या जाणार आहेत. यापुढचा कोकण दौरा हा विविध विभागांच्या अधिकाऱयांना घेऊन केला जाणार आहे. कोकणात उद्योगांसाठी आवश्यक असलेले मोठे ट्रेनिंग सेंटर उभारणी केली जाणार आहे. त्या ठिकाणी मशीनरींसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. 200 कोटींचे हे ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्गातील ओरोस येथे प्रस्तावित असल्याचे राणे यांनी सांगितले. त्या ठिकाणी आंबा, काजू, नारळ, फणस, कोकम अशा सर्व फळ प्रक्रियासंदभांत मार्गदर्शन मिळणार आहे. जेणेकरून येथील उद्योगांच्या माध्यमातून लोकांना, शेतकऱयांना, बागायतदारांच्या उत्पन्नात भर पडण्यास मोलाची मदत होईल, असे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.