उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची महत्वपूर्ण घोषणा
प्रतिनिधी/ चिपळूण
नाणार येथील स्थानिक जनतेचा रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळे नाणारला हा रिफायनरी प्रकल्प होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही यांनीही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाणार सोडून अन्य कोणत्याही गावातील स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असेल आणि तशी मागणी झाली तर रिफायनरी नक्की होऊ शकते. या बाबत सर्वेक्षणही सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत हे शुक्रवारी गुहागर दौऱयावर होते. शहरातील काही नागरिकांच्या गाठीभेटीनंतर त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प, शहरातील सांस्कृतिक केंद्र आणि लोटे परिसरात उच्च व तंत्र शिक्षण खात्यामार्फत इन्स्टीटय़ुट सुरू करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत माहिती देतानाच त्यांनी बहुचर्चित नाणार रिफायनरीवर उघडपणे महत्वपूर्ण विधान केले.
ते म्हणाले की, रिफायनरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या कोरोनाने निर्माण केलेल्या स्थितीत हा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, ही मुख्यमंत्र्यांचीही भूमिका आहे, परंतु नाणार येथील स्थानिक जनतेचा विरोध असल्याने त्या ठिकाणी तो प्रकल्प होणार नाही. यापुढे नाणार प्रकल्प हा नामोल्लेखही होता कामा नये. रत्नागिरी जिह्यातील नाणारसह एकूण 11 व सिंधुदुर्गमधील दोन अशा एकूण 13 गावांत हा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे नाणार वगळून जर अन्य गावांतील स्थानिक जनतेला किंवा रत्नागिरी जिह्यात इतर ठिकाणाहून स्थानिकांनी मागणी केली तर निश्चितपणे मुख्यमंत्री विचार करतील, असेही ते म्हणाले. आपल्या जिह्यात हा प्रकल्प व्हावा, अशी तुमची इच्छा आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, माझ्या मनात असून नसून काही उपयोग नाही. स्थानिक जनतेचा कौल महत्वाचा आहे व शिवसेना नेहमी स्थानिकांच्या बाजूने उभी राहिली आहे. तसे पाहता माझ्या रत्नागिरी मतदार संघात आता प्रकल्पासाठी कुठेच जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळ नाणार वगळून कोणत्या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो, या बाबत सर्वेक्षणही सुरू असल्याची माहिती सामंत यांनी दिली.