ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे राजीनामा देत असल्याचे खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना माझ्या बद्दल तक्रार होती तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते.
तसेच अशा वेळी कोणाला तरी व्हिलन ठरवायचे असते, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, याबाबत मला आता कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे ते म्हणाले, मी योग्य वेळ आली की बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.