रेडी सिद्धेश्ववर मंदिर समुद्र किनारपट्टीवर असलेली नादुरुस्त बार्ज तेथून हालविण्यात यावी.
रेडी ग्रामस्थांची सरपंचाकडे मागणी.
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
रेडी सिद्धेश्ववर मंदिर नजिकच्या समुद्रकिनारपट्टीवर गेले तीन महिने नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बार्जमुळे तेथील लोकांची गैरसोय होत असून हा बार्ज त्वरीत तीथून हालविण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी रेडी सरपंच यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दादा राणे, जगदीश गवंडी, सगुण सातोस्कर, आनंद आसोलकर, प्रशांत आसोलकर यांनी रेडी सरपंच यांची भेट घेवून त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रेडी बंदरावर ऑक्टोबर ते मे या कालावधीत 20 ते 25 बार्जेस खनिज निर्यातीसाठी येतात. चालू वर्षात मे महिन्यात झालेल्या वादळामुळे या बार्जपैकी दोन बार्जेस सिद्धेश्ववर किनारपट्टीवर लागल्या. त्यापैकी एक बार्ज मालकाने गोवा येथे नेली. मात्र एक बार्ज नादुरुस्त झाल्याने आजपर्यंत सिद्धेश्ववर किनारपट्टीवर रुतून आहे.
सिद्धेश्ववर किनारपट्टी हिशांत व सुंदर किनारपट्टी असून पोहण्यास सुरक्षित असल्याने स्थानिक व पर्यटक इथे समुद्रस्थानाचा आनंद घेण्यासाठी येतात. तसेच रेडीतील बहुतांशी बहुतांशी नौका या ठिकाणी काढल्या जातात. तसेच येथे गणेश विसर्जनहि करण्यात येते. या बार्जमुळे गणेश भाविकांना खडकाळ भागात गणेश विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे दुर्घटनाहि घडू शकते. सद्या मच्छिमारांना होडया काढणे, रापण लावणे शक्य होत नसल्याने त्यांचेहि नुकसान होत आहे. त्यामुळे सदर बार्ज लवकरात लवकर काढण्यात यावी. मच्छिमारांचे आजपर्यंत झालेले नुकसान बार्ज मालकाने द्यावे. भविष्यात अशा भंगार बार्ज किनारपट्टीवर ठेवण्यात येवू नयेत अशी मागणी केली आहे.