मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा पुन्हा रद्द करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांनी अचानकपणे उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द केला होता. उत्तर महाराष्ट्राचा दौरा 27 ते 29 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. परंतु, कोरोनाच्या कारणास्तव हा दौराही तुर्त स्थगित करण्यात आल्याचे पत्र काँग्रेसचे उपाध्यक्ष नगराळे यांनी पाठवले आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले हे प्रत्येक जिल्ह्यात जावून तेथील आढावा घेत आहेत. तसेच ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षातील कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी अचानकपणे नाशिमध्ये झाला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्यासह पक्षातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला हवा होता, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मात्र, पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे छोट्याखानी कार्यक्रम घ्यावा लागला. यानंतर आपण लवकरच जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.त्यानुसार उत्तर महाराष्ट्राचा दौरा आयोजित करण्यात आला होता मात्र कोरोनामुळे हा दौरा पुन्हा रद्द करण्यात आला आहे.