ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोलेंच्या आरोपांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पटोले महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहे, असे सांगत त्यांनी एक सल्लाही दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल, असे मला वाटत नाही. मुळात राजकारणात पाळत ठेवणे याचे खूप वेगळे अर्थ निघतात. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेची माहिती सरकारकडून घेतली जाते. मलाही सुरक्षा आहे, माझीही माहिती सरकारकडे असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर कुठे जातात? काय करतात? एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे धोका आहे का? याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. पटोले हे महाराष्ट्रातील अति महत्त्वाची व्यक्ती आहे. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये. काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावे, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.