ऑनलाईन टीम / मुंबई :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले असून नाना पटोले यांची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केल्याची बातमी सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जात आहे. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भुमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका मविआला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले आहे.
माहितीअभावी केलेले आरोप : नवाब मलिक
तर पटोले यांनी माहितीअभावी हे आरोप केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात सरकार कोणाचेही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलीस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा याबाबत गृहखात्याला माहिती देत असते. ही माहिती कुठल्याही पक्षाशी संबंधित असू शकते. कुणा एका पक्षाविषयी नसते. पटोलेंना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला आहे.