मुंबई/प्रतिनिधी
राज्यात आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याआधी सांगितले आहे. राज्यात स्वतंत्र निवडणूक लढवून काँगेसचा मुख्यमंत्री असेल असे त्यांनी म्हंटले होते. आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असे म्हंटले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असं म्हणत स्वबळाचा नारा दिला आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष पूर्ण झाली असतानाच काँग्रेसकडून आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला जात असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीसोबत युती करावी लागेल असं सूचक विधान केलं होतं. या सर्व घडामोडींदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
यावेळी चव्हाण यांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं होतं. भाजपने राज्यात सर्वत्र गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्याप भाजपला सत्ते पासून दूर ठेवणे हेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये कुमकुवत आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे.
शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी , “तुम्ही हवा तसा विचार करू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात झालं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते स्वबळाचा नारा देत असले तरी येणारा काळ सांगेल की राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसला महाविकास आघाडीसोबतचं राहावं लागणार आहे.