ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील ट्वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर काँग्रसने आक्षेप नोंदवला आणि नावं बदलून विकास होतो का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
त्यानंतर आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. हे तीन पक्षांचे सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. नामांतराच्या विषयी एकत्र बसून चर्चा करु आणि योग्य मार्ग काढू, असे अजित पवार म्हणाले.
मुंबईत अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, मी मागील आठवड्यातच याबाबत बोललो होतो. हे तीन पक्षांचे सरकार आहे, किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. तिघांचे सरकार चालत असताना काही विषय कधी निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करुन योग्य पद्धतीचा मार्ग काढू.
पुढे ते म्हणाले, आज आमची बैठक आहे. या प्रकरणात नक्की काय झाले. जाणीवपूर्वक गडबड केली का या बाबी तपासल्या जातील. आम्ही एकत्र मार्ग काढू. कधीकधी अशाप्रकारच्या गोष्टी घडतात, यामागचे नक्की कारण काय आहे हे विचारुनच, शहानिशा करुनच या विषीय वक्तव्य करेन.