ज्यांचा या नामांतराला विरोध आहे, त्या आरपीआय, एमआयएम हे राहिले बाजूला या नामांतरावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा एकदा सामना बघायला मिळत आहे.
2020 या वर्षात आलेल्या कोव्हिड महामारीमुळे सर्वच क्षेत्र चांगलेच होरपळून निघाले, 2021 या वर्षात काही गोष्टी सुरळीत होत असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्यातील काही ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत, तर राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण चांगलेच तापू लागले असून औरंगाबादचे संभाजी नगर आणि नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगू लागला आहे. औरंगाबादला शिवसेना आणि शिवसैनिक संभाजीनगर असेच बोलतात मात्र याचे अधिकृत नामांतर झाले नसल्याने आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचा जुनाच विषय पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याची मूळ मागणी ही शिवसेनेची, मात्र सध्या उस्मानाबादची कोणतीच निवडणूक नसल्याने फक्त औरंगाबादचा मुद्दा गाजत आहे, त्यातच औरंगाबाद नाव बदलण्यास शिवसेनेसोबत राज्यात सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने विरोध केल्याने नेमका हाच मुद्दा पकडून भाजप आणि मनसेने हा विषय लावून धरताना शिवसेनेचा टार्गेट केले आहे. काँग्रेसची भूमिका सोडा शिवसेना ज्या काँग्रेससोबत सत्तेत आहे त्यांनी या नामांतराला केलेल्या विरोधानंतर आता शिवसेनेला याबाबत सवाल विचारला जात आहे, तर काँग्रेस किमान समान कार्यक्रमात औरंगाबाद नामांतराचा विषय नसल्याचे सांगत आहे, त्यामुळे कधीकाळी संभाजीनगर या नामांतराच्या मुद्यावरून औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जिंकणाऱया शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला आम्ही एक वर्षापूर्वीच औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण संभाजीनगर विमानतळ करण्याबाबत प्रस्ताव दिला असल्याचे सांगत केंद्र सरकारने याबाबत काहीच केले नसल्याचे सांगितले, म्हणजे ज्यांचा या नामांतराला विरोध आहे, त्या आरपीआय, एमआयएम हे राहिले बाजूला या नामांतरावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा एकदा सामना बघायला मिळत आहे. शिवसेनेने संभाजीनगर हे नामांतर भाजपच्या काळातच व्हायला पाहिजे होते असे बोलताना पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपचे युती सरकार आल्यानंतर शिवसेनेने भाजपच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध करताना भाजपची चांगलीच गोची केली होती, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांत आणि संयमाने हे सरकार अखंड महाराष्ट्राचे पुरस्कर्ते असल्याचे सांगत शिवसेनेच्या कलेने घेतले होते. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र सत्तेत असल्याने त्यांची समान विचारधारा असणारा विरोधी पक्ष नसल्याने यांना प्रश्न विचारणारा तसा कोणी समविचारी नाही. मात्र हिंदुत्वाची समान विचारधारा असणारा भाजप हा प्रमुख पक्ष विरोधी पक्षात असल्याने शिवसेनेला प्रत्येक मुद्यावर आज भाजप विचारत आहे. भाजपकडून आलेल्या काही प्रश्नांवर जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या बाजूने बोलत असली तरी शिवसेनेच्या उर्दू पॅलेंडरमध्ये सिवाजी जयंती असा केलेला उल्लेख असो किंवा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब बालासाहेब ठाकरे असा केलेला उल्लेख असो अशा मुद्यावरून भाजप शिवसेनेला चांगलेच खिंडीत गाठत आहे आणि अशावेळेला शिवसेनेची चांगलीच गोची होताना बघायला मिळत आहे.
वर्षाच्या शेवटी शेवटी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीने समन्स बजावल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे, शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावला, त्यानंतर शिवसेना ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या, मात्र संजय राऊत यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले, दुसरीकडे भाजपातून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना इडीने समन्स पाठवून 30 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र खडसे यांनी आपल्याला कोरोनासदृश लक्षणे असल्याचे सांगत 14 दिवसांची मुदत मागितली आहे, खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले अनेक जण संपर्कात असल्याचे तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱया आमदारांनी राजीनामा द्यावा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आघाडी सरकारची असल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते, मात्र त्यानंतर वातावरण पुन्हा एकदा शांत झाले आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून असणाऱया या सरकारमध्ये सध्या काँग्रेस नाराज असल्याचे चित्र आहे, राष्ट्रवादीने भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडले, त्यातच काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केली, भाई जगतापांनी पदभार स्वीकारताना स्वबळावर लढण्याची भाषा करताना मुंबईचा पुढचा महापौर हा काँग्रेसचा असल्याचे बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगले सामंजस्य असून दोन्ही पक्षाचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे मूळ हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांना भूमिकेबाबत तशी अडचण नाही. मात्र काँग्रेसच्या येथील नेत्यांचे हायकमांड दिल्लीत असल्याने त्यांना पक्षाच्या विचारधारेच्या बाहेर तशी भूमिका घेता येत नाही त्यातच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सरकारमध्ये राहून अरे ला कारे करत नसल्याने आणि राष्ट्रवादी काहीशी काँग्रेसवर हावी होत असल्याने प्रदेशाध्यक्षपद थोरात यांच्याकडून दुसऱया कोणाकडे तरी सोपविले जाण्याची शक्यता असून थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सोमवारी राजकीय वर्तुळात होती आता थोरात यांच्या जागी कोणाची वर्णी लागते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे