ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यानंतर नारदा केसमध्ये त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. आज सीबीआयने टीएमसीच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. यामध्ये फिरहाद हकीम, सुब्रत चटर्जी, सोवन चटर्जी आणि मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
- मला पण अटक करा : ममता बॅनर्जी
या प्रकरणी एका मंत्र्यासह दोन आमदार आणि एका नेत्याला अशा चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड खवळल्या आहेत. त्या सीबीआच्या कार्यालयात पोहचल्या आणि त्या म्हणाल्या, आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाही अटक करा, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून त्या निजाम पॅलेसमध्ये असून या परिसरात टीएमसी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.
- काय आहे नारदा घोटाळा ?
पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017 मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.