बोम्माई मंत्रिमंडळात ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, ते तर नाराज आहेतच. ज्यांना मिळाले आहे तेही इच्छित खाते मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. मंत्रिमंडळात अजून तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यासाठी नवी दिल्ली येथे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई मंत्रिमंडळात आपल्याला हवे ते मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आनंद सिंग, एम. टी. बी. नागराज आदी नव्या मंत्र्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. आनंद सिंग यांनी तर आपले खाते बदलले नाही तर राजीनामा देऊ, असा इशाराच दिला होता. गेल्या चार दिवसांपासून या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. बुधवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांची मनधरणी केली. मुख्यमंत्र्यांनीही समजूत काढल्यानंतर ते थोडे वरमले. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, ते तर नाराज आहेतच. ज्यांना मिळाले आहे तेही इच्छित खाते मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. बसवराज बोम्माई मंत्रिमंडळात अजून तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यासाठी नवी दिल्ली येथे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येडियुराप्पा पायउतार झाल्यानंतर कर्नाटकातील राजकारणात स्थिरता येणार ही अटकळ फोल ठरली आहे. उलट सध्या येडियुराप्पा यांचे वास्तव्य असलेले कावेरी निवास शक्तीकेंद्र बनू लागले आहे.
आनंद सिंग हे काँग्रेसला राम राम ठोकून भाजपला येऊन मिळाले होते. येडियुराप्पा मंत्रिमंडळात ते मंत्री झाले. त्यांच्या हट्टाखातर बळ्ळारी जिल्हय़ाचे विभाजन झाले. बळ्ळारी फोडून विजयनगर स्वतंत्र जिल्हय़ाची घोषणा करण्यात आली. बेळगाव जिल्हा विभाजनाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. गोकाकनेही जिल्हय़ाचा दर्जा देण्याची मागणी पुढे रेटल्यामुळे चिकोडी जिल्हय़ाची घोषणा रखडली. राजकीय अनिवार्यतेपुढे शेवटी नमते घ्यावे लागते. त्यामुळेच विजयनगर जिल्हय़ाची घोषणा झाली. आता आपल्याला हवे ते मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आनंद सिंग नाराज झाले आहेत. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध आघाडी उघडल्यामुळे मंत्रिपद गमावलेले सी. पी. योगेश्वर यांनी मंत्रिपदासाठी पुन्हा लॉबिंग सुरू केले आहे. एम. पी. रेणुकाचार्य यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे बसवराज बोम्माई सरकारचा उर्वरित दीड-दोन वर्षाचा कार्यकाळही रुसवेफुगवे, नाराजी दूर करण्यातच जाणार, हे अधोरेखित होते आहे.
मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना हायकमांडने येडियुराप्पा यांना राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. आपण राज्यपालपद स्वीकारणार नाही. कर्नाटकाच्या राजकारणात सक्रिय असणार, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते मुख्यमंत्री असताना कावेरी बंगल्याला जितके महत्त्व होते तितकेच महत्त्व आजही आहे. नाराज आणि असंतुष्ट आमदार कैफियत मांडण्यासाठी साहजिकच येडियुराप्पांकडे जातात. सत्तांतरानंतर परिस्थिती स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा अवधी लागतो. तोपर्यंत प्रत्येकाची घालमेल वाढते. सध्या अशीच परिस्थिती कर्नाटकात पहायला मिळते. काँग्रेस-निजदला राम राम ठोकून ज्यांनी भाजपची कास धरली होती, त्यापैकी अनेक आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही. खरेतर येडियुराप्पा यांच्यावर विश्वास ठेवून ते भाजपवासी झाले होते. आता येडियुराप्पा मुख्यमंत्री नाहीत तरीही या 17 जणांना संतुष्ट आणि समाधानी ठेवावेच लागणार आहे. नव्या मुख्यमंत्र्यांसाठी हे कसरतीचे ठरते आहे. पक्षाचे मूळ व निष्ठावंत नेते-कार्यकर्ते आणि ‘ऑपरेशन कमळ’ अंतर्गत भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचीही मर्जी राखणे जिकिरीचे ठरते आहे. सध्या नव्या मुख्यमंत्र्यांना ही भूमिका पार पाडावीच लागणार आहे.
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज असलेला गट एकत्र येऊ लागला आहे. त्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. पुढील राजकारणाचे छक्केपंजे ठरविण्यात येत आहेत. सध्या जे रुसवेफुगवे सुरू आहेत, ते तात्पुरते आहेत. भविष्यात मंत्रिपदावरून जोरदार नाराजीनाटय़ घडण्याची शक्मयता आहे. कारण, येडियुराप्पा यांचा राजकीय वारसदार बी. वाय. विजयेंद्र यांना मंत्रिपद मिळावे, त्यांच्याकडे प्रभावी व महत्त्वाचे खाते सोपवावे, यासाठीचे प्रयत्न थांबलेले नाहीत. कदाचित लवकरच होणाऱया पोटनिवडणुकीत ते नशीबही आजमावतील. केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर हायकमांडचीही कसोटी लागणार आहे. कारण मंत्रिपदासाठी नाराजांचा एक गट सक्रिय आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची घेतलेली भेटही त्यांच्याच पक्षात वादाची ठरली आहे. देवेगौडा हे राजकीय मुत्सद्दी आहेत. त्यांच्या कुटुंबाने राजकारणात अर्ध्या शतकाहून अधिक काळ गाजविला आहे. राजकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून ही भेट झाली असली तरी भाजपचे आमदार प्रीतमगौडा यांनी त्याला विरोध केला आहे. ही भेट गैर ठरविली आहे.
राजकीय खेळी किंवा शिष्टाचाराचा एक भाग म्हणून वेगवेगळय़ा पक्षातील नेत्यांची भेट घेणे गैर ठरत नाही. मात्र, प्रीतमगौडा ज्या हासनमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत, त्या मतदारसंघात निजदचा खासकरून देवेगौडा कुटुंबीयांचा दबदबा आहे. हा दबदबा मोडून ते विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची घेतलेली भेट त्यांना अजिबात रुचली-पचली नाही. म्हणून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांच्या या विरोधाला भाजपमधूनच टीका होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अधूनमधून देवेगौडा यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचे कारण ते ज्येष्ट आहेत. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी माजी पंतप्रधान आहेत. राजकारणात ज्येष्ट व्यक्तिमत्त्व आहे. म्हणून सर्वच पक्षातील नेते त्यांचा आदर करतात. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची घेतलेली भेटही पक्षातील वितंडवादास कारणीभूत ठरली आहे. म्हणूनच की काय सिद्धरामय्या यांनी बोम्माई सरकार फार काळ टिकणार नाही, असे भविष्य वर्तविले आहे. आम्ही ते पाडणार नाही. ते स्वतःच पडेल. या सरकारबद्दल आणखी 3 महिने तरी आपण काही बोलणार नाही. जे घडेल ते जनता स्वतःच अनुभवेल, असेही सूतोवाच त्यांनी केले आहे.