प्रतिनिधी / मडगाव
पणजी महानगरपालिका निवडणुकीत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात विरूद्ध भाजपचे कार्यकर्ते असे सद्या वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस उघडय़ावर आलेली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. ही नाराजी पुढील दोन-तीन दिवसात दूर केली जाईल. त्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि जर कुणी टोकाची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर पक्षाअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले आहे.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, आमदार क्लाफास डायस, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर इत्यादी उपस्थित होते.
पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर व दत्तप्रसाद नाईक यांनी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलच्या विरोधात उघडरित्या भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस उघडय़ावर आलेली आहे. या संदर्भात बोलताना तानावडे म्हणाले भाजप पक्ष ही एक ‘फॅमिला’r आहे. त्यामुळे फॅमिलीत नाराज होणे हे स्वाभाविक असते. पण, ही नाराजी चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यात येईल. सिद्धार्थ कुंकळय़ेकर व दत्तप्रसाद नाईक यांची कृती ही पक्षविरोधी आहे का असा सवाल केला असता, ही पक्षविरोधी कृती नसून केवळ नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो व आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पालिका आरक्षणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. याकडे तानावडे यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, हाताची पाचही बोटे समान नसतात, त्यात काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही की, नाराजी व्यक्त होत असते आणि गुदिन्हो व आल्मेदा यांच्या संदर्भात काहींसे असेच घडले असावे असे ते म्हणाले.
आरक्षणाचा कोणताही परिणाम भाजपवर नाही
निवडणुकातील आरक्षण हे कोणताही राजकीय पक्ष करीत नाही हे सर्वांना ठाऊक आहे. याची जाणीव दिगंबर कामत यांनादेखील आहे. ते मुख्यमंत्री होते व आत्ता विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करणे स्वाभाविक आहे. परंतु, आपण त्या विषयावर चर्चा व भाष्य करणार नाही. कारण आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोचलेला आहे. पण, काहीही झाले तरी त्याचा भाजपवर कोणताच परिणाम होणार नाही. अकरा नगरपालिका व एक महानगरपालिका यामध्ये भाजपने समर्थन दिलेले सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात उद्यापर्यंत आरक्षणावर निवाडा होईल. जर पाच पालिकांची निवडणूक लांबणीवर पडली तर पणजी महानगरपालिका सहीत उर्वरित पालिकामध्ये निवडणूक होईल व त्यात भाजप समर्थक उमेदवार विजयी होतील तसेच जर पाच पालिकांची निवडणूक लांबणीवर पडली तरी त्या पालिकांमध्ये सुद्धा भाजपचेच उमेदवार विजयी होतील असा आपल्याला ठाम विश्वास आहे. या पालिकांवर सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने काही लोक बघत आहेत. त्यांची स्वप्ने ही स्वप्नेच राहतील, ती पूर्ण होणार नाही असे तानावडे म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्यावेळी राज्यात अनेक आंदोलने सुरू होती. तरी सुद्धा ग्रामीण भागातील लोकांनी भाजपवर विश्वास दाखविला. त्याच पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत शहरी भागातील मतदारांचे म्हणणे काय आहे व कौल आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार असल्याचे तानावडे म्हणाले.
पालिका आरक्षणाच्या मुद्दावरून काही नगरपालिका क्षेत्रातून त्वरित नकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त झालेल्या आहेत. परंतु, येणाऱया दोन-तीन दिवसात यात सुधारणा होईल व भाजपचे कार्यकर्ते आपल्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे तानावडे म्हणाले.