(अध्याय चौथा)
नारायणाचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने कामदेवाना बद्रिकाश्रमात पाठवले. कामदेवांनी त्यांना प्राप्त असलेल्या मायेच्या शक्तीच्या जोरावर नारायणाचा तपोभंग करण्याच्या दृष्टीने बद्रिकाश्रमातले वातावरण बदलून टाकले होते. त्यानुसार बद्रिकाश्रमात वसंत अवतरला. अप्सरांचे नृत्य गायन सुरू झाले. मदनाने आपला बाण सोडला पण नारायणावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. नारायणाच्या परम शांतीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. नारायण स्वतः परमात्मा आहेत हे लक्षात घेऊन ते परत निघाले पण नारायणाने योगसामर्थ्याने त्यांची गती कुंठित केली. तेव्हा कामदेवानी त्यांची स्तुती केली तसेच स्वतःबद्दल सांगताना ते म्हणाले, आम्ही सर्वांना त्रास देतो पण हरिभक्तांपुढे आमचे काही चालत नाही. कामदेवाचे थोडेसे आत्मप्रौढीचे भाषण ऐकून नारायणाला मनातल्या मनात हसू आले. आपण स्वतः उत्तमोत्तम अप्सरांमार्फत कुणालाही भुरळ पडून कुणाचाही तपोभंग करू शकतो अशी दर्पेक्ती त्याच्या भाषणात नारायणाला जाणवली. वास्तविक पाहता नुकताच नारायणाचा तपोभंग करण्याचा त्याचा प्रयत्न वाया गेला होता. उत्तमोत्तम अप्सरा आदि देखावा केवळ आपणच निर्माण करू शकतो असा कामदेवाचा समज होता. नारायणाने ठरवले की, याला काही चमत्कार दाखवावा. कामदेवाची गंमत करायची ठरवून भगवंतानी त्यांच्या योगमायेच्या सामर्थ्याने एक लीला रचली. त्यातून कामदेवाना एक अद्भुत चमत्कार दिसला. रूप, वैभव, अलंकार इत्यादींनी युक्त उत्तमोत्तम स्त्रिया त्यांना दिसू लागल्या. त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या. त्यांच्यापुढे स्वर्गातून आलेल्या अप्सरा सुर्यापुढे काजव्यासारख्या निस्तेज दिसू लागल्या. त्यांना पाहून मदन मूर्च्छा येऊन पडला, वसंत मिटक्मया मारू लागला, क्रोध तटस्थ झाला, अप्सरांची तोंडे काळवंडली. नारायणाच्या भोवताली असलेल्या लावण्यवती स्त्रियांच्या अंगाचा जो सुवास सुटला होता त्याने वसंत वेडा झाला. नारायणास भुलवण्यास जे कामादीगण आले होते त्यानाच योगमाया दाखवून नारायणाने चकित केले. उघडच आहे कामदेवाच्या मायेपुढे नारायणाला प्राप्त असलेली विद्या योग सामर्थ्यामुळे कितीतरी अद्भुत होती. आपल्या योग सामर्थ्यामुळे चकित झालेल्या कामदेवादी मंडळींची आणखीन गंमत करायचे ठरवून श्रीनारायण त्यांना हसत हसत म्हणाले, ‘तुम्ही अहेर म्हणून यातील एकीचा स्वीकार करा. म्हणजे ती स्वर्गाचे भूषण होईल.’ त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून कामादी गण त्यातील सर्वात सुंदर अशा उर्वशीला घेऊन निघाले. तिला पाहून सर्व देवलोक चकित झाला. इंद्र तर वेडापिसा झाला. अशी नारायणाच्या पहिल्या अवताराची कथा आहे.’ आपल्याला छळणाऱयाचा स्वीकार करणे हे पूर्ण अवस्थेचे लक्षण आहे. भगवत भजन करणाऱयांच्या मार्गात विघ्ने आणणे हे इंद्राचे काम! पण भक्ती जर सच्ची असेल तर इंद्रालाही हात चोळत बसावे लागते. कारण नुसत्या नेत्रकटाक्षाने भगवंत सर्वांचे नियमन करत असतात. हरिनामानेच भक्तांचे संरक्षण होत असते. भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतात.
क्रमशः