प्रतिनिधी /वास्को
चिखलीचे माजी सरपंच तसेच सांकवाळ कोमुनिदादचे सदस्य प्रताप म्हार्दोळकर यांनी नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने नारायण नाईक यांच्यावरच केलेले विविध आरोप हे हल्ला प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला पाठीशी घालण्यासाठीच असून हल्ला प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी हा सारा खटाटोप करण्यात येत आहे. नारायण नाईक यांच्याविरूद्ध आरोप असल्यास त्यांच्याविरूध्द कारवाई आवश्य व्हावी. पोलिसांनी या तपासासाठी प्रताप म्हार्दोळकर यांची मदत घ्यावी अशी मागणी सांकवाळचे पंच तुळशिदास नाईक यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी चिखलीचे माजी सरपंच व सांकवाळ कोमुनिदादचे सदस्य प्रताप म्हार्दोळकर यांनी नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला का झाला याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी करून नारायण नाईक यांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला होता. ते खंडणीखोर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती व त्यांच्या काही गैरव्यवहारांवर बोट ठेवले होते.
पोलिसांनी म्हार्दोळकर यांच्या मदतीने नारायण नाईक यांची चौकशी करावी
प्रताप म्हार्दोळकर यांनी नारायण नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांसंबंधी त्यांचे बंधु व सांकवाळचे पंच तुळशिदास नाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. म्हार्दोळकर यांनी केलेले आरोप हे हल्ला प्रकरणावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी व या आरोपांव्दारे हल्ला प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला पाठीशी घालण्यासाठीच करण्यात आलेले आहेत. गुरे कापणाऱया व्यक्तींना नारायण नाईक यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली. हल्ला झाल्यानंतर वाचवण्यासाठी आलेलाच शेवटी या प्रकरणात गुंतलेला असल्याचे उघडकीस आले. प्रमुख सुत्रधारही गजाआड होईल. पोलीस या प्रकरणाचा छडा लावतीलच. मात्र, नारायण नाईक यांच्यावर आरोप करून हे प्रकरण सौम्य होणार नाही. ज्या नारायण नाईक यांच्याविरूध्द म्हार्दोळकर यांनी खंडणीखोरीचा आरोप केलेला आहे. त्या नारायण नाईकविरूध्द अद्याप एकही तक्रार किंवा गुन्हा नोंद झालेला नाही. उलट प्रताप म्हार्दोळकर हे एका खून प्रकरणात दोषी ठरले होते. तरीही म्हार्दोळकर यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी नारायण नाईक यांच्याविरूध्द तक्रारी दाखल कराव्यात. पोलीस चौकशी व्हावी. नारायण नाईक दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई व्हावी. या चौकशीसाठी पोलिसांनी म्हार्दोळकर यांचीच मदत घ्यावी असे तुळशिदास नाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सरपंच बोरकर व म्हार्दोळकर यांच्यातील व्यवहारांचीही चौकशी व्हावी
सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्यावरही तुळशिदास नाईक यांनी आरोप केले. सरपंच बोरकर व म्हार्दोळकर यांची सलगी असून त्यांच्या व्यवहारांचीही चौकशी व्हायला हवी. सरपंच बोरकर यांना यापूर्वी नारायण नाईक यांच्या तक्रारींमुळेच जेलमध्ये जावे लागले होते. नारायण नाईक यांनी गैरप्रकारांविरूध्द तक्रारी करून त्यांचा पाठपुरावाही केलेला आहे. त्यांनी सांकवाळ कोमुनिदाद जमीनींबाबतचे घोटाळे चहाटय़ावर आणलेले आहेत.
कोमुनिदादच्या भुखंड विक्री व अतिक्रमणांचीही चौकशी व्हावी, नारायण नाईक यांनीच केल्या होत्या तक्रारी
कोमुनिदाद प्रशासकांनी म्हार्दोळकर यांनाही नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी घरपट्टी कशी मिळवली हाही प्रश्न आहे. कोमुनिदादचा एक भुखंड म्हार्दोळकर यांनी सरपंच बोरकर यांचे पुत्र नेहाल बोरकर यांना कसा विकला याचीही चौकशी व्हायला हवी. सरपंच रमाकांत बोरकर व त्यांच्याशी संबंधीत 34 घरे असून बहुतेक घरांना कोमुनिदाद प्रशासकांनी कारवाईसाठी नोटीसा बजावलेल्या आहेत. ही कोमुनिदाद जमीनीवरील अतिक्रमणे असून या प्रकरणांचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी तुळशिदास नाईक यांनी केली आहे. या सर्व प्रकरणांविरूध्द नारायण नाईक यांनीच तक्रारी केल्या होत्या. त्याचाच परीणाम म्हणून नाईक यांच्यावर हल्ला झालेला असून आपल्यावरही असा हल्ला होऊ शकतो अशी भिती तुळशिदास नाईक यांनी व्यक्त केली. हल्ला प्रकरणात पोलिसांनी गजाआड केलेला करीय्या याचा सांकवाळ पंचायत कार्यालयात बराच वावर असायचा. तो कार्यालयात का व कसले व्यवहार करायचा याचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
हल्ला प्रकरणामुळे कोमुनिदाद जमीन व्यवहारातील घोळ चहाटय़ावर सांकवाळ कोमुनिदादचे माजी अध्यक्ष तसेच आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्यास आज शनिवारी एक आठवडा पूर्ण होत आहे. आतापर्यंत या प्रकरणात हल्ल्याची सुपारी देणाराच गजाआड झालेला असून हल्लेखोर आणि प्रमुख सुत्रधार मात्र अद्याप हाती लागलेले नाहीत. सध्या हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभाग हाताळीत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने सांकवाळ कोमुनिदादमधील जमीन विक्रीचे घोळ उघडकीस येऊ लागलेले असून हे प्रकरण कोमुनिदादच्या जमीनींच्या व्यवहारांभोवतीच फिरू लागलेले आहे.