डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सल्ला
मृत्यूची दिलेली आकडेवारी चुकीची
..तर आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा!
प्रतिनिधी / सावंतवाडी:
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. राणेंची ही मागणी उतावळेपणाची आहे, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सरकार हे कोरोना साथरोगाशी लढताना अपयशी ठरल्याचा अजब दावा राणे यांनी केला आहे. खासदार राणेंनी महाराष्ट्रात 52 हजार व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झालेली असून आतापर्यंत त्यातील 16 हजार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अजब दावा केला. त्यांनी कुठून आणला हा आकडा, असा सवाल करत महाराष्ट्रात मृत्यूदर हा 3.5 ते 4 टक्के असल्याचे ते म्हणाले.
वास्तविक खासदार राणे हे महाराष्ट्रातील एक ज्ये÷ राजकीय नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री होते. गेल्या 25 वर्षात त्यांनी विरोधी पक्षनेता ते अनेक खात्याचे मंत्री अशी पदे भूषविली आहेत. अशा ज्ये÷ नेत्याने महाराष्ट्रावर साथरोगाचे अभूतपूर्व संकट असताना सरकार अस्थिर करण्यासाठी किंवा पाडण्यासाठी वाटेल ते दावे करून आधीच चिंताग्रस्त असलेल्या सामान्य जनतेला घाबरवण्याचे प्रयत्न करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही, असेही डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात कोरोना साथीचे संक्रमण वाढत आहे .दिवसागणिक कोरोना संक्रमित व्यक्तींचा आकडा वाढत आहे. पण महाराष्ट्रातील मृत्यूदर हा आजही 3.16 एवढा आहे. आजपर्यंत एकूण 55 हजार पॉझिटिव्ह केसेस आणि 1750 रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. देशाचा मृत्यूदर हा 2.86 टक्के आहे.
शेजारच्या गुजरात राज्यात जिथे भाजपची सत्ता आहे, तेथे मृत्यूदर 6.18 टक्के म्हणजेच महाराष्ट्राच्या जवळपास दुप्पट आहे. मग राणेंच्या आग्रही मागणीनुसार जर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची असेल, तर त्याआधी ती गुजरात राज्यात लावणे गरजेचे आहे. गुजरात राज्य कमी प्रमाणात टेस्ट करत असल्याने गुजरात उच्च न्यायालयाने तेथील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गुजरात सरकारतर्फे देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बोगस असल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची अजब, अतक्मर्य व उतावीळपणाची मागणी करताना खासदार राणेंनी थोडा संयम ठेवणे गरजेचे होते, असेही डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.