प्रतिनिधी / कोल्हापूर
आशिया खंडातील देशांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समावून घेतले नाही. यामुळे येथील देशांची आर्थिकदृष्टय़ा प्रगती होवू शकली नाही. उलट अमेरीका, ऑस्ट्रेलीया सारख्या खंडांत महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याने येथील देशांची प्रगती झाली. पुढील आठ ते दहा वर्षात भारताला महासत्ता बनायचे असल्यास महिलांना सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सामावून घेणे गरजेचे आहे. नारीशक्तीच्या योगदानातूनच भविष्यात भारत महासत्ता बनेल असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज अभियान, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन मैदानावर जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी, राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्व्हा शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला आरक्षणाचे कायदे आणले. सुरवातीच्या काळात महिला सदस्या सभागृहात जाणे टाळत होत्या. परिणामी महिलांचा कारभार पूर्णता त्यांचे पती बघत असत. मात्र आता काळ बदलला आहे. महिला आत्मनिर्भर बनल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वरचष्मा दिसून येत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या गाव, शहर विकासासाठी काम करत आहेत. येथून पुढे ही महिला सक्षमीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, युवतींना उच्चशिक्षित करण्यासाठी पुढील काळात शासनाकडून विविध योजना राबविल्या जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षेचा कायदा लवकरच केला जाईल. महाराष्ट्राच्या अंदाजपत्रकात अर्थमंत्र्यांनी प्रथमच जेंडर बजेटींगचा उल्लेख केला. विभागस्तरावर महिला आयोगाचे रिसिव्हिंग केंद्र सुरु करतोय. महिला बचत गटांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सरकाचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, ही जबाबदारी प्रत्येकाने ठेऊन तिला सुरक्षा द्यायला हवी, असे मंत्री ऍड. ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सक्षमपणे काम करत आहेत. बचत गटाच्या अध्यक्ष ही नवी ओळख पुढे आली आहे. असंघटीतपणे काम करणाऱया महिला आहेत, महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचे मुल्यमापन होणे आवश्यक आहे. जिह्यामध्ये दुध व्यवसायात मोठय़ा प्रमाणात महिलांचे योगदान आहे. यावरच ग्रामीण आर्थिक व्यवस्था टिकून आहे. या व्यवसायामध्ये नवी संकल्पना उमेदने आणावी ती महिलांसाठी संजीवनी ठरेल. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमधील काही अटी बदलाव्या लागतील. बचत गटांना कमी व्याज दराने मिळणाऱया कर्जाचा वापर त्यांनी बचत गटाच्या उर्त्कषासाठी करावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
महिला व बालविकास सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी स्वागत केले. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी प्रास्ताविकात विविध योजनांची माहिती दिली. समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे आदींसह पाच जिह्यातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमा दरम्यान एका मुलीवर अथवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाया जोडप्यांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप, विविध महिला स्वयंसहाय्यता समुहांना सीआयएफ तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यलो रिव्होल्युशन, पोषण पंधरवडय़ाचा शुभारंभ आणि पोषण आकार दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले
ठाकूर यांच्या कवितेला उपस्थितांची दाद
‘इतुके दिवस बोललो..ओठातल्या ओठात आम्ही
आता कोठे बोलावयाची खरी सुरुवात केली..
तू रोज एक नेम कर.. स्वतःवर तू प्रेम कर..’ महिला व बालकल्याण मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी भाषणाला सुरवात करण्यापुर्वी केलेल्या या कवितेला उपस्थित महिलांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मेळाव्यामध्ये केलेल्या घोषणा –
– आंध्रपदेशच्या धर्तीवर महिला संरक्षण कायदा राबवणार
– मायक्रो फायनान्स, खाजगी सावकारांकडून बचत गटांनी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्नशील
– 10वी व 12वीच्या विद्यार्थिनींना 10 हजार विद्यावेतन देणार
– लोकसभा, विधानसभेत महिलांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
– अस्मिता सॅनिटरी नॅपकीन सर्व शाळांमध्ये उपलब्ध
– महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणार
– जिल्ह्य़ातील दुग्ध उत्पादक महिलांच्या दुग्धजन्य पदार्थांनाही बाजारपेठ उपलब्ध करणार
– भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत बंद केलेल्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करणार
– शासकीय कार्यालयातील रिक्त जागी लवकरच मेगा भरती
– 65 वर्षांवरील ज्येष्ठांच्या मदत निधीत 1 हजारांची वाढ
– मुलाला नोकरी मिळेपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतंर्गत संबंधित महिलांना पेन्शन मिळणा