प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव-आनंदनगर, दुसरा क्रॉस परिसरातील नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. नाल्याचे बांधकाम झाले नसल्याने पावसाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहते. परिणामी परिसरातील संपूर्ण रस्ते खराब झाले असून, खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे नाल्याचा बंदोबस्त करावा. तसेच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अनगोळहून वाहणारा नाला आनंदनगर परिसरातून जातो. सदर नाल्याच्या बांधकामासाठी परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. दरवषी पावसाळय़ात नाला ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत असल्याने नाल्याची मोजणी करावी व बांधकाम करावे, अशी विनंती अनेकवेळा करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे कायम कानाडोळाच केला आहे. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आनंदनगर परिसरातील गटारीचे बांधकामही करण्यात आले नाही. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ठिकठिकाणी कचरा साचून राहत असल्याने रस्त्यावरून सांडपाणी वाहते. त्यामुळे आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. पावसाचे पाणी वाहिल्याने रस्त्यावरील डांबर व खडी वाहून गेली आहे. परिणामी दगड वर आले असून, ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्याचा काठ पावसामुळे वाहून गेल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. खड्डय़ांमुळे दररोज अपघात घडत आहेत. साई कॉलनी परिसरातील रस्ता संपूर्ण उखडला आहे. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहने अडकून बसण्याचे प्रकार घडत आहेत. खुल्या जागेत सांडपाणी साचून राहत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
परिसरातील पथदीपही नादुरुस्त असल्याने अंधार पसरलेला असतो. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील नाल्याचे बांधकाम करून पावसाच्या पाण्याला वाट करून देणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दरवषी पावसाळय़ात येथील रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने परिसरातील समस्यांची पाहणी करून समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.