तन्मय दाते/ रत्नागिरी :
सध्या आफ्रिकेमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. संचारबंदी व लॉकडाऊनही सुरू आहे. कामानिमित्त येथे आलेली जनता जिथे होती तिथेच आहे. कुणी जेवायला घाला अशी मागणीही केली नाही आणि जेवायला घातले नाही म्हणून कोणी आरडा-ओरडापण केला नाहीये. सर्वजण स्वतःच्या मर्जीने सोशल डिस्टंन्सिंग व अन्य सूचनांचे पालन करत आहेत. सध्या जोहान्सबर्ग येथे राहणाऱया मुळ रत्नागिरीच्या वृषाली बेडेकर (पूर्वाश्रमीच्या शीला भास्कर दाते) सांगतात.
जोहान्सबर्ग येथे त्यांचा छोटासा ऑटो स्पेयर पार्टसचा व्यवसाय आहे. देशातील सर्व धार्मिक स्थळे पहिल्या दिवसपासूनच बंद आहेत. सर्वत्र संचारबंदी आहे, मूळातच येथे पायी चालणारे फारसे नाहीत, पण जे काही थोडेफार लोक असतात तेही या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर येत नाहीत. बहुसंख्य जनता सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहे. जीवनावश्यक सेवा उपलब्ध आहेत पण त्यासाठी घरातील एकच व्यक्ती खरेदीसाठी जाऊ शकते. खरेदीच्या ठिकाणीहि सुरक्षित अंतर, सॅनिटीझर, मास्क हेही आहेच. विशेष जाणवणारी बाब म्हणजे येथील सर्वजण स्वतःच्या मर्जीने सोशल डिस्टंन्सिंग व अन्य सूचनांचे पालन करत आहेत.
फुकट कोणी मागत नाही.. कोणी देतही नाही
देशातील शाळा, कॉलेजेस तर केव्हाच बंद केली आहेत पण सर्वांचे ऑनलाईन क्लासेस मात्र चालू आहेत. सर्व हेल्थ क्लब, जिम बंद आहेत. थोडा पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम लोकांना जाणवतो आहे, पण त्यालाही कोणी फालतू विरोध करत नाहीये. उगीचच विरोध करायचा म्हणून विरोध करणे हा प्रकार इथे नाही. सरकारने इथे संचारबंदीबरोबरच काही आर्थिक सवलती दिल्या आहेत. सर्व व्यवसायांवरील कर, लोनचे हफ्ते तीन महिन्यांसाठी पुढे ढकलले आहेत. प्राईम लेन्डिंग रेटहि कमी केला आहे. पण फुकट काहीही नाही, अर्थात कोणी फुकट मागतही नाही….आणि कुठलीही पोलिटिकल पार्टी फुकट देतही नाही. सरकारने ज्यांचे व्हिसा संपत आहेत त्यांना जुलैपर्यंत एक्स्टेंशन दिले असल्याचे त्या सांगतात.
जनतेला भडकवणारे कोणीही नसल्याने शांतता
बहुसंख्य जनतेचा सरकारला सपोर्ट आहे. लोक स्वतःहून नियमांचे पालन करत आहेत. नागरिक खूपच पापभिरू आहेत. दोनशे प्रकारचे आरडाओरडा करणारे टीव्ही प्रचारक नाहीत त्यामुळे जनतेला भडकवणारे लोकही नाहीत. त्यामुळे शांतता आहे. इथला सर्वात मोठा व्यवसाय पर्यटन आहे, त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक आणि परदेशातून परत आलेली लोक ह्यामुळेच इथे ह्या रोगाचा संसर्ग आला आहे. खूपच कमी लोकांना लोकल ट्रान्समिशन झाले आहे.
भारतातील फालतू ‘काव-काव’ बंद व्हायला हवी
लोकसंख्येचा विचार करता साऊथ आफ्रिकेच्या तुलनेत भारताची स्थिती बरी आहे पण हे काम कोणा एकाच व्यक्तीचे नाही. त्याला सर्वांची साथ असणे आवश्यक आहे. भारतातील टीव्ही प्रसारण बंद करून कायदा मोडणाऱयाला कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. ठराविक लोक कावकाव करत असतात, त्यांना प्रथम प्रसिद्धीपासून दूर ठेवले पाहिजे. एक भारतीय म्हणून मला कीव येते आपल्या लोकांची! जो काम करतोय, जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडतोय त्याला साथ द्यायची सोडून त्याच्या फालतू विरोधामुळे हवालदिल झालो आहोत. तरीसुद्धा भारतात ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली जातीये ते बघून मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.