निवडणूक आयोगाचे नवे दिशानिर्देश- विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ 2 जणांना जाता येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्याच्या दुसऱया दिवशी म्हणजेच मंगळवारी निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमांमधील कोरोना नियमांबद्दल कठोर झाला आहे. आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिनाबद्दल एक आदेश दिला आहे. मतमोजणीदरम्यान किंवा निकाल जाहीर झाल्यावर कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही तसेच जल्लोषही करता येणार नाही. निकालानंतर कुठलाही उमेदवार केवळ दोन जणांसह स्वतःच्या विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी जाऊ शकतो.
2 मे रोजी तामिळनाडू, केरळ, पुड्डुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बंगालमध्ये 7 टप्प्यांमधील मतदान पार पडले आहे. अखेरच्या टप्प्यासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उर्वरित राज्यांमधील मतदान आधीच पार पडले आहे.
न्यायालयाचा इशारा
कोरोनामुळे बिघडती स्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला फटकारले होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे मुख्य न्यायाधीशांनी म्हटले होते. 2 मे रोजी मतमोजणीच्या दिवसासाठी कोविड दिशानिर्देश लागू न केल्यास मतमोजणी रोखू असा इशाराही देण्यात आला होता. आरोग्य सचिवांसोबत मिळून आयोगाने 2 मे रोजी होणाऱया मतमोजणीसाठी योजना आखावी आणि 30 एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर सादर करावी असे उच्च न्यायालयाने सांगितले होते.
करूर मतदारसंघासाठी याचिका
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या करूर विधानसभा मतदारसंघात होणाऱया मतमोजणीवरून दाखल याचिकेवर सुनावणी केली आहे. या मतदारसंघात 77 उमेदवार उभे असल्याने 2 मे रोजी मतमोजणीवेळी येथे दिशानिर्देशांचे पालन केले जावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
भाजपकडून निर्णयाचे स्वागत
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करणारा ट्विट केला आहे. निवडणूक विजयाच्या जल्लोष समारंभ आणि मिरवणुकांवर बंदी घालण्याच्या आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. भाजपच्या सर्व प्रदेश शाखांना या निर्णयाचे कठोरपणे पालन करण्याचा निर्देश दिला आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते संकटाच्या या काळात गरजूंची मदत करण्यासाठी सरसावले असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.